Advertisement

२ टक्के लोकं कळत-नकळतपणे मुंबईकरांना मारत आहेत- महापौर

केवळ २ टक्के बेपर्वा नागरिक मास्क न घालताच समाजात वावरत आहे. यातूनच ते कळत नकळत ९८ टक्के मुंबईकरांचा जीव धोक्यात घालत आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

२ टक्के लोकं कळत-नकळतपणे मुंबईकरांना मारत आहेत- महापौर
SHARES

कोरोना संकटाच्या काळात मुंबईकर नियमांचं पालन करून सावधगिरी बाळगत आहेत. परंतु केवळ २ टक्के बेपर्वा नागरिक मास्क न घालताच समाजात वावरत आहे. यातूनच ते कळत नकळत ९८ टक्के मुंबईकरांचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यांना मारण्याचं काम करत आहेत, अशा कडक शब्दांत कोरोना सुरक्षा संदर्भातील नियमांचं पालन न करणाऱ्या मुंबईकरांना मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुनावलं आहे. (bmc mayor kishori pednekar appeals to wear face masks compulsory in mumbai due to covid 19)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेपर्वा नागरिकांना समज दिली आहे. त्या म्हणाल्या की, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेतच. परंतु प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक पातळीवर सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून मुंबईत ३० सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

हेही वाचा- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त

घराबाहेर निघताना, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं प्रत्येक मुंबईकराला सक्तीचं करण्यात आलं आहे. तरीही काही जण मास्क न घालताच वावरताना दिसून येत आहेत. अशा मुंबईकरांची संख्या २ टक्के असली, तरी हे बेफिकीर लोकं ९८ टक्के मुंबईकरांना धोका निर्माण करत आहेत. त्यांना मारण्याचं काम करत आहेत. हा अतिआत्मविश्वास दुसऱ्याच्या जीवावर बेततोय याची त्यांना काहीच कल्पना नाही. ज्या लोकांच्या घरात कोरोनामुळे मृत्यू होतो, त्यांना किती त्रास होतो, हे निर्दयी लोकं समजून घ्यायला तयारच नाहीत. 

काही लोकं तर गळ्यास सोन्याच्या चैनी घालून, गाॅगला लावून फिरतात, पण त्यांच्या तोंडाला मास्क नसतो. मास्कविषयी विचारलं, तर चक्क ते पैसे नाहीत म्हणून सांगतात. ही मानसिकता पूर्णपणे चुकीची आहे. मास्क न घालणारे अपराधी आहेत, असा रोकठोक मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं. 

अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यात टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्यात येत आहे. मुंबईकरांना बऱ्याच सवलती दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मुंबईकरांनी देखील अधिक सावध राहून, पुरेशी काळजी घेऊनच सार्वजनिक ठिकाणी वावर केला पाहिजे.  लोकांनी मास्क लावला नाही, तर कोरोनाला हरवायला खूप वेळ लागेल, असा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी दिला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा