महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. पण असं असलं तरी नागरिकांना परिस्थितीचं गांभीर्य नाही. आजही अनेक जण मास्क न लावता किंवा मास्क व्यवस्थित न घालता समाजात वावरताना दिसतात. पण अशा बेजबाबदार नागरिकांसाठी पालिकेनं कंबर कसली आहे. बृहन्मुंबई महापालिकेद्वारे 'विना मास्क' विषयक जोरदार जनजागृती सुरू करण्यात आली आहे.
'विना मास्क' वावरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फेरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. यात महापालिकेचे अति वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.
यावेळी आयुक्त म्हणाले की, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणी 'मास्क नाही, प्रवेश नाही', 'नो मास्क, नो एन्ट्री', अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर सर्व बसेस, टॅक्सी, रिक्षा इत्यादींवर देखील याच आशयाचे स्टीकर्स लावण्याचे निर्देश देण्यात आलेत. या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महापालिका सातत्याने जनजागृतीपर कार्यवाही करीत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्क योग्यप्रकारे परिधान न करणाऱयांवर प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी रुपये २०० यानुसार दंडात्मक कारवाईदेखील यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई अधिक व्यापक व अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
आता दंडात्मक कारवाईसोबतच मास्क न घालणाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकित प्रवेश नाही मिळणार. त्यामुळे नागरिकांनी आता या कारवाईला तरी गंभीरतेने घेऊन मास्क घालावा.
हेही वाचा