रस्त्यांवर खाद्यपदार्थ बनवून विकणाऱ्या, तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधातील अतिक्रमणांवर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याकरता महापालिकेच्या वतीने पथक तयार करण्यात आले आहे. परिमंडळातील सर्व पथकांना एकत्र करून दर गुरुवारी विशेष पथकाच्या माध्यमातून केलेल्या कारवाईला सुरुवात झाली आहे. मागील दोन गुरुवारी एकूण १०५२ फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी १८ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आबासाहेब जऱ्हाड यांनी अनधिकृत बांधकामांसोबतच फेरीवाल्यांविरोधातील कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. खाद्यपदार्थ रस्त्यांवर बनवून विकणे, रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाला इत्यादी अतिक्रमणांवर रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, दर गुरुवारी प्रत्येक परिमंडळातील उपायुक्तांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व पथकांना एकत्र करुन एक संयुक्त विशेष पथकामार्फत कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार २१ व गुरुवार २८ सप्टेंबर २०१७ या दोन दिवशी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने या दोन दिवसांमध्ये एकूण १०५२ अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली. यात ८० चारचाकी हातगाड्या व ५० सिलेंडर्ससह १ कोटी १८ लाख ३१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
उपायुक्त रणजित ढाकणे (अतिक्रमण निर्मूलन) तसेच सहायक आयुक्त विश्वास शंकरवार यांच्यासह दि. २१ व २८ सप्टेंबर २०१७ या दोन दिवशी करण्यात आलेल्या कारवाईच्या वेळी सर्व विभागाचे सहायक आयुक्त, उप अनुज्ञापन अधीक्षक, सहायक अनुज्ञापन अधीक्षक, वरीष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) व वाहन निरीक्षक हे उपस्थित होते. जप्त केलेल्या सिलेंडर्ससंबंधी संबंधित पोलिस स्टेेशन येथे एफआयआर नोंदविण्यासाठी पत्र देण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त रणजित ढाकणे यांनी दिली आहे.
हेही वाचा