वांद्रे पश्चिमेकडील रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचं म्हणत सिनेअभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर यानं टि्वटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली अाहे. मुंबई महापालिकेने सेंट अँड्रयू रोड तसंच मेहबूब स्टुडियो जंक्शनचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केल्यानं रस्त्यांची कामे करणाऱ्या कंपनीलाच ते खड्डे बुजवण्याचं कंत्राट दिल्यानं अाश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याला काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी तीव्र विरोध करत हा प्रस्तावच रोखून धरला. या रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत कंत्राटदाराला ५० हजारांचा दंड महापालिकेच्या वतीनं ठोठावण्यात आला अाहे.
मुंबई महापालिकेच्या वतीनं एच पश्चिम विभागातील अनेक रस्त्यांची कामं हाती घेतली. परंतु या कंत्राटदारांनी रस्त्यांच्या विकासकामांवर शेवटचा हात फिरवत ती योग्यप्रकारे करण्याऐवजी अर्धवटच सोडून दिली. सेंट अँड्रयू रोडसह मेहबूब स्टुडियोजवळील चौकांची कामं निकृष्ट दर्जाची केली अाहेत. याबाबत फरहान अख्तरनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
I suspect the contractor that paved St Andrews road in Bandra has used a seesaw instead of a leveller. #zeropointsforquality
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) May 29, 2018
स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी परिमंडळ तीन मधील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदाराच्या निवडीचा प्रस्ताव मंजुरीला आला असता, काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरियांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचं लक्ष याकडे वेधलं. प्राधान्य क्रमांक ३ अंतर्गत एच/पश्चिम भागात तीन रस्त्यांची कामे करण्यात आली आहे. त्यातील एक रस्ता हा सेंट अँड्रयू रोड असून हे काम योग्यप्रकारे झालेलं नाही. तसंच उर्वरीत दोन रस्त्यांच्या कामांचीही अशाचप्रकारे तक्रार आहे. आपण स्वत: एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे तसंच अधिकाऱ्यांसह या रस्त्यांची पाहणीही केली. यावेळी ही कामे योग्यप्रकारे झाली नसल्याचंही दिसून आल्याचं झकेरिया यांनी सांगितलं.
त्यामुळे जो कंत्राटदार योग्यप्रकारे रस्त्यांची कामे पूर्ण करू शकला नाही, त्यालाच आता परिमंडळ ३ मधील खड्डे बुजवण्याचे कंत्राट दिलं जात आहे. म्हणजे त्यांनी आधी रस्त्यांची वाट लावायची आणि मग त्यानेच खड्डे बुजवायचे असा प्रशासनाचा विचार आहे का? असा सवाल आसिफ झकेरियांना यांनी केला. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रभाकर शिंदे, अभिजित सामंत, रईस शेख, विद्यार्थी सिंह, राजूल पटेल आदींनी चर्चेत भाग घेत पुढील दोन वर्षांचे कंत्राट आधीच देत प्रशासन पुन्हा या रस्त्यांवर खड्डे पडणार हे कबूल करते का? असा सवाल केला.
झकेरिया यांनी उपस्थित केलेल्या वांद्र्यातील रस्त्यांच्या कामांची पाहणी आपण स्वत: करणार असल्याचं सांगत जर ते बांधकाम अर्धवट तसंच निकृष्ट दर्जाचं असेल तर त्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असं अभियांत्रिक सेवा व प्रकल्प विभागाचे संचालक विनोद चिठोरे यांनी आश्वासन दिलं. एच/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्याशी संपर्क साधला असता, या कंपनीला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आल्याचं सांगितलं. तसंच २ दिवसांमध्ये या रस्त्याचं काम व्यवस्थित करून देण्याबाबत नोटीस बजावली असल्याचे सांगितलं.
हेही वाचा-
कोस्टल रोडच्या कामांसाठी ‘एचसीसी’ आणि ‘एल अँड टी’मध्ये स्पर्धा
पैशांअभावी रखडलं गझधरबंद पम्पिंग स्टेशनचं काम