जगभरात कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा प्रसार नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती उपाययोजना करीत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १७ जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.
नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलही (Hinduja Hospital) कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखत आहे. असं म्हटलं जात आहे की, हिंदुजामध्ये एका रुग्णास दाखल करण्यासाठी आणलं गेलं होतं. तो काही दिवसांआधी दुबई हून आल्याचं रुग्णालयातल्या डॉक्टरांना कळालं. त्यानंतर त्याला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. एका सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, रुग्णानं सुरुवातीला दुबईला जाऊन आल्याची माहिती डॉक्टरांना दिली नव्हती.
खबरदारी म्हणून हिंदुजा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह सुमारे ५५ ते ८० कर्मचाऱ्यांना आवश्यक ती टेस्ट करण्यास सांगितलं गेलंय. रुग्णालयातील काही रूग्णांना देखील वेगळं ठेवण्यात आलं आहे. रुग्णालयात खबरदारी म्हणून योग्य ती काळजी घेतली जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी टेस्ट केल्या आहेत त्यांचे रिपोर्ट अजून आले नाहीत. रिपोर्ट आल्यानंतरच सर्व माहिती कळेल.
महाराष्ट्रात आतापर्यंत १७ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ मुंबई आणि १ ठाणे इथले आहेत. उर्वरित रुग्ण पुणे आणि नागपूर इथं नोंदवण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आयोजित पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, पुढील सूचना येईपर्यंत मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि नागपुरात सर्व जीम, थिएटर आणि जलतरण तलाव बंद करण्यात येत आहेत. मॉल आणि रेस्टॉरंट्स खुले असतील. परंतु जनतेला गर्दीतल्या ठिकाणी जाणं टाळा, असा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा