वर्सोवा ते मढदरम्यान नागरिकांना बोटीने प्रवास करावा लागतो. वर्सोवा या मुख्य भूमीपासून मढ हे खाडीमुळे वेगळे झाले आहे. हे अंतर काही मीटरवर असतानाही नागरिकांना बोटीने प्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यान आतापर्यंत स्थानिकांकडून 2 रुपये आणि पर्यटकांकडून 3 रुपये आकारले जात होते.
पण या शुल्कात 1 नोव्हेंबर 2017 पासून वाढ करण्यात आली आहे. या प्रवासाचे शुल्क प्रती व्यक्ती 4 रुपये आणि पर्यटकांना 5 रुपये करण्यात आले आहे. या दरवाढीला राजगुरूनगर पश्चिम विभाग प्रतिष्ठान, स्थानिक नागरिक तसेच डबेवाल्यांचा विरोध आहे. कारण, डबेवाल्यांची जवळ-जवळ चारशे कुटुंब मढ बेटावर रहातात.
या रहिवाशांना रोजगारासाठी दररोज मढ - वर्सोवा बोटीने प्रवास करावा लागतो. या दरवाढीचा थेट फटका त्यांना बसणार आहे. मढ-वर्सोवा पुलाची मागणी जुनीच आहे. जर हा पूल झाला असता, तर ही समस्याच राहिली नसती. स्थानिक आणि पर्यटकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा प्रकार आहे. फेरीबोट चालवणारी संस्था सरसकट सर्वांकडून पर्यटकांचे शुल्क आकारते. डबेवाल्यांची कुटुंब गेली 10 ते 15 वर्ष त्याठिकाणी रहात आहेत. त्यांचे रेशनकार्ड, आधारकार्ड त्या पत्त्यावरचे आहे. मतदान त्या ठिकाणी होते. असे असले तरी फेरीबोट चालवणारी संस्था त्यांना स्थानिक मानत नाही. त्यांच्याकडून पर्यटकांचे शुल्क आकारते. ही उघड-उघड लूट आहे.
ही दरवाढ कमी करावी आणि पर्यटक म्हणून स्थानिकांची होणारी लूट थांबावी, यासाठी मत्स्य व बंदर मंत्री यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली.
हेही वाचा