कल्याणमधील मध्य रेल्वेवरील धोकादायक १०२ वर्षे जुना पत्रीपूल अखेर इतिहासजमा झाला आहे. रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून पत्रीपुलाच्या पाडकामाला मध्य रेल्वेनं सुरूवात केली होती. तब्बल सहा तासानंतर २.३५ मिनिटांनी हे पाडकाम पूर्ण झालं. काम पूर्ण झाल्याबरोबर मध्य रेल्वेनं रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करत वाहतूक पूर्ववत केली. या मार्गावर पहिली मेल मुंबईच्या दिशेनं पावणे तीनच्या सुमारास रवाना झाली.
धोकादायक पत्रीपूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेकडून रविवारी, १८ नोव्हेंबरला सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० दरम्यान सहा तासांचा जम्बोब्लाॅक घेण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं. तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी लोकलच्या किती आणि कोणत्या फेऱ्या रद्द केल्या, कोणत्या एक्सप्रेस, गाड्या रद्द केल्या, कोणत्या गाड्यांच्या मार्गात बदल केले हे ही रेल्वेकडून आधीच जाहीर करण्यात आलं होतं. तर जम्बोब्लाॅकच्या दरम्यान रेल्वेनं प्रवास करणं टाळावं असं आवाहनही केलं होतं.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केडीएमटी आणि एसटीकडून अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार केडीएमसीनं दर १० ते १५ मिनिटांनी विशेष बसगाड्या सोडल्या. तर एसटीनंही या मार्गावर २५ ते ३० विशेष बस सोडल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. या पुलाच्या पाडकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यानं एक तास आधीच पाडकाम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचंही रेल्वकडून सांगण्यात आलं आहे. तर येत्या काळात या ठिकाणी नवीन पुल उभारला जाण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचा -
१०२ वर्षे जुना पत्रीपुल इतिहासजमा, पुलाच्या पाडकामाला सुरूवात
विक्रोळीतील कन्नमवारनगर सांस्कृतिक कलाभवनाचा भाग कोसळला