मुंबईसह राज्यभरात १० दिवस मुक्कामासाठी आलेल्या गणपती बाप्पाचं गुरूवार 'अनंत चतुर्दशी'ला विसर्जन होणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्त मोठ्या जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत बाप्पाला निरोप देतात. परंतु, यंदा गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीवेळी महापालिकेच्या काही नियमांच पालन करावा लागणार आहे. त्यानुसार, गणेश विसर्जन मिरवणूक जुन्या रेल्वे पुलावरून काढताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.
'मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व गणेशभक्तांना आणि गणेशमंडळांना सूचित करण्यात येतं आहे की, रेल्वेवरील पूल हे अतिशय जुने झाल्यानं धोकादायक स्वरूपाचे झाले आहेत. त्यामुळं सर्व गणेशभक्तांनी हे पूल गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी पार करताना काळजी घ्यावी', असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.
जुन्या पुलावरून विसर्जनावेळी जाताना गटागटानं जावं. जेणेकरून पुलावर एकाचवेळी १६ टनापेक्षा अधिक वजन होणार नाही. पुलावर ध्वनिक्षेपकाचा वापर करून नाच-गाणी करू नये. उत्सवाचा आनंद पुलावरून खाली आल्यावर घ्यावा. पुलावर जास्त वेळ थांबू नये. पुलावरून त्वरित पुढे जावे. पोलीस, महापालिका यांनी दिलेल्या सूचनेनुसार ये-जा ठेवावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे विसर्जनावेळी चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज आणि करी रोड रेल ओव्हर ब्रिज ओलांडताना सूचनांचं काळजीपूर्वक पालन करावं, असे आवाहन देखील मुंबई महापालिकेनं केलं आहे.
हेही वाचा -
महाराष्ट्र एसटी महामंडळाचा कर्नाटक महामंडळाला भाडेवाढ करण्याचा सल्ला
गणेशोत्सव २०१९: अनंत चतुर्दशीला हलक्या पावसाची शक्यता