Advertisement

मंत्रालयातील कामाच्या वेळा दोन शिफ्ट्समध्ये करा, मुख्यमंत्र्यांची सूचना

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशा रितीने बसवता येतील, याचं तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

मंत्रालयातील कामाच्या वेळा दोन शिफ्ट्समध्ये करा, मुख्यमंत्र्यांची सूचना
SHARES

कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशा रितीने बसवता येतील तसंच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचं तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

मंत्रालयात सुमारे ५ हजारहून अधिक कर्मचारी विविध विभागांमध्ये काम करतात. त्यापैकी मागील २ दिवसांमध्ये ७५ कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढं आलं आहे. शिवाय मंत्रालयात सातत्याने येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीमुळेही कोरोनाचा धोका वाढलेला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने कार्यालयीन वेळा बदलण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे.

राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळी उद्धव ठाकरे (uddhav thackerayयांनी या सूचना दिल्या. महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तसंच मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची यावेळी उपस्थिती होती.

कार्यालयीन वेळांची १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्यसंस्कृतीची सुरुवात करावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा- “कल करे सो आज कर”, कार्यालयीन वेळेबाबत पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी

आपण या  नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू. ज्यामध्ये कामे संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसंच सर्वांना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचं नियोजन कसं करता येईल ते पाहावं, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

“कल करे सो आज कर, आज करे सो अभी” अशी राज्य शासनाची भूमिका असून कोरोना (covid19) संकटाच्या काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही तर आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो. कोरोना विरोधातील लढा अजूनही संपलेला नाही. नवे बदल आपण स्वीकारत आहोत. त्यामुळे कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून केंद्राने नवीन राष्ट्रीय धोरण आखावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीती आयोगाच्या बैठकीत केलं होतं.

त्यानंतर केंद्राला सल्ला देण्याऐवजी उद्धव ठाकरे त्याची महाराष्ट्रापासूनच सुरूवात का करत नाहीत? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ लागला. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा