उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ आणण्यावर मनाई कायम असल्याने प्रेक्षकांची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने प्रेक्षकांची कोंडी दूर करत १ ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचं आणि घरचं जेवण तसंच पाणी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ एआरपी दरात देण्याचे आदेशही मल्टिप्लेक्स मालकांना दिले आहेत. राज्य सरकारच्या नियमांचं पालन न करणाऱ्या मल्टिप्लेस मालकांना कारवाईचा इशाराही सरकारने दिल्याने सिनेमा बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांच्या खिशावर जास्त भार पडणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही.
सद्यस्थितीतही मल्टिप्लेक्समध्ये घरचं, बाहेरचं जेवण आणि पाणी आणू दिलं जात नाही. त्यामुळे नाइलाजाने प्रेक्षकांना मल्टिप्लेक्समधलं महागडं पाणी आणि खाद्यपदार्थ विकत घ्यावे लागतात. पण १ ऑगस्टपासून प्रेक्षकांना बाहेरचं आणि घरचे खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये घेऊन जाता येतील.
मल्टिप्लेक्समध्ये घरचं आणि बाहेरच जेवण घेऊन जाण्यास बंदी नाही, अशी माहिती अन्न व पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. सोबतच मूळ किमतीतच खाद्यपदार्थ आणि पाणी विकण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
राज्य सरकारनं यासंबधीचा निर्णय घेतला असून या निर्णयची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी होईल, असंही चव्हाण यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे मल्टिप्लेक्समध्ये घरचं जेवण पाणी नेण्यापासून रोखलं तर कारवाई करण्यात येणार असल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.
हेही वाचा -
मल्टिप्लेक्समध्ये ५ रुपयांचं पॉपकॉर्न २५० रुपयांत का?, न्यायालयानं सरकारला झापलं