कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लाॅकडाऊन आहे. त्यामुळे संपूर्ण देश ठप्प आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे. मुंबईत अडकलेल्या विस्थापित, कष्टकरी कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्व 24 विभागांमध्ये 734 मोफत जेवण वाटप केंद्र सुरु केली आहेत. त्या माध्यमातून दररोज दोन वेळचं जेवण गरजूंना दिलं जात आहे.
तब्बल 4 लाख 61 हजार इतकी दोन वेळची तयार जेवणाची पाकिटं गरजूंना विनामूल्य पुरवली जात आहेत. आवश्यकता असल्यास संबंधितांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-221292 यावर संपर्क साधावा. त्यानुसार त्यांना मदत पुरवली जाईल, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी केलं आहे.
मुंबईत मोठ्या संख्येने कामगार, मजूर, विस्थापित आहेत. परराज्यातीलही अनेक मजूर आहेत. लाॅकडाऊनमुळे अनेकांना आपल्या राज्यात जाता आलं नाही. हजारो लोक मुंबईत अडकले आहेत. या विस्थापित व कष्टकरी तसंच लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या गरजू व्यक्तींसाठी दोन वेळचे तयार जेवण पुरवण्याचं काम 28 मार्चपासून सातत्याने केलं जात आहे. मुंबईतील विविध लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, संबंधित स्थानिक नगरसेवक यांच्या सहकार्याने समन्वय साधून अन्नाचे वितरण केलं जात आहे.
या वितरण केंद्रांच्या माध्यमातून सुरुवातीला रस्त्यावर राहणाऱ्या, बेघर व्यक्तींना जेवण देण्यात येत होते. विस्थापित व कष्टकरी, कामगार, मजूर अशा सगळ्यांची गरज लक्षात घेता या कामाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सध्या दोन वेळची मिळून सुमारे 4 लाख 61 हजार 100 इतकी तयार जेवणाची पाकिटे मोफत दिली जात आहेत. वेगवेगळ्या कम्युनिटी किचन्सच्या माध्यमातून जेवण तयार केले जाते. बेस्ट प्रशासनाच्या 48 वातानुकूलित बसेसद्वारे मुंबईतील 24 विभाग कार्यालयांच्या क्षेत्रात एकूण 734 केंद्रांवर हे जेवण पोहोचवले जाते. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत अशा दोनवेळेस सर्व गरजूंना विनामूल्य तयार जेवण पुरवले जात आहे. या सर्व कामांमध्ये बिगर शासकीय संस्था, सेवाभावी संस्था व व्यक्ती, बचतगट यांचंही सहकार्य मिळत आहे.
हेही वाचा -