मागील अनेक दिवस उकाड्यानं हैराण झालेले मुंबईकर मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, अखेर मान्सूनने रविवारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावली. याबाबत भारतीय हवामान विभागानं माहिती दिली. मान्सून रविवारी मुंबईत दाखल असला तरी दिवसभर पावसानं विश्रांती घेतली होती. परंतु, आता मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मंगळवारी नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतदेखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल असून, येत्या ४८ तासांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातसह मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारसह उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रविवारी मान्सून मध्य अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्राचा काही भाग, मुंबई, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगडचा काही भाग, झारखंड आणि बिहारमध्ये दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी मान्सूनने वेगाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. येत्या ५ दिवसांत म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील २ दिवस कोसळणाऱ्या पावसानं रविवारी विश्रांती घेतली होती. सकाळी रिमझिम कोसळणाऱ्या पावसानं दुपारनंतर दडी मारली होती. रविवारपर्यंत कोसळलेल्या पावसाची सरासरी ३८६.२२ मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे.
हेही वाचा -
सुशांतनं आत्महत्येपूर्वी 'या' अभिनेत्याला केला होता फोन, पण...
मी ‘राजनिष्ठ’, राज ठाकरेंच्या वाढदिवसाला नांदगावकरांची भावनिक पोस्ट