मुंबईत बुधवारी आढळून आलेल्या नव्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेत वाढ झाली आहे. एकाच दिवसात तब्बल २ हजार ५१० नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण कमी झाल्यानं थोडी उसंत मिळाली होती. मात्र काही दिवसातच कोरोनाचा पुन्हा नवा व्हेरिएंट आला आणि पुन्हा एकदा चिंता वाढली. पण बुधवारी एकट्या मुंबईचा आकडा २ हजार ५१० च्या पुढे गेल्यानं प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत.
मंगळवारी मुंबईत १,३०० पुढे कोरोना रुग्ण आढळून आले होते, मात्र आज जवळपास रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाढ सहाजिकच सर्वांची डोकेदुखी वाढवणारी आहे.
मुंबई महापालिकेडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यात हॉटेल आणि उपहारगृहांचे दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. महानगरपालिका आणि पोलीस प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक लक्ष ठेवणार आहे.
संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना आगमन प्रसंगी आरटीपीसीआर चाचणी आणि ७ दिवसाचे क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे.
हवाईमार्गे आलेल्या आणि लक्षणं नसलेल्या कोविडबाधित रुग्णांसाठी बीकेसी आणि नेस्को कोविड केंद्रात स्वतंत्र, निःशुल्क विलगीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच मालाड आणि कांजूरमार्ग कोविड केंद्र तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
हेही वाचा