कोरोना (coronavirus) च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू (death) झाला आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई (mother) व वडील (father) असे दोन्ही पालक अथवा त्यापैकी एका पालकाचा मृत्यू होऊन मुले (children) अनाथ (orphaned) झाली आहेत. तसंच कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्या पत्नीला कौटुंबिक व आर्थिक हानीला आकस्मिकरित्या सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे त्यांचं भवितव्य अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशी बालके व महिला या शिक्षण, रोजगार व आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तसंच त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून आता नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) त्यांना आर्थिक मदतीचा (financial assistance) हात दिला आहे. अनाथ मुलांना तसंच पती गमावलेल्या पत्नीला मदतीचा हात देण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी चार कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे.
कोरोनामुळे दोन्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या मुलांच्या संगोपनाकरिता अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. या योजनेनुसार बालक अठरा वर्ष पूर्ण करेपर्यंत दरमहा मिळणाऱ्या अर्थसहाय्यास पात्र राहील.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य
वय वर्ष ० ते ५ - रु. २००० प्रतिमहा
वय वर्ष ६ ते १० - रु. ४००० प्रतिमहा
वय वर्ष ११ ते १८ - रु. ६००० प्रतिमहा
एक पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य
वय वर्ष ० ते ५ - रु. १००० प्रतिमहा
वय वर्ष ६ ते १० - रु.२००० प्रतिमहा
वय वर्ष ११ ते १८ - रु. ३००० प्रतिमहा
कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या १८ ते २१ वयोगटातील बेरोजगार युवक, युवतींकरिता शैक्षणिक बाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी ५० हजार रुपये प्रतिवर्ष अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे.
पतीचे निधन झालेल्या महिलेस १.५० लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. महिलेस स्वयंरोजगारासाठी, व्यावसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण हयातीत एकदाच एक लाख रूपये देण्यात येतील.
या चारही योजनांची सविस्तर माहिती, सादर करावयाची कागदपत्रे तसेच इतर अनुषांगिक माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हेही वाचा -
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी-विरार मार्गावरील प्रवाशांना दिलासा!