महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जिल्हे दुष्काळाशी सामना करत असताना मुंबईकरांवर कधीही पाणीबाणी ओढावू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठाच शिल्लक आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांहून कमी आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.
महापालिकेचे मुख्य जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांनी स्थायी समितीत दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये मिळून २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा ७ धरणांतून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवण्यात येतं. त्यासाठी या सातही धरणांमध्ये मिळून १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाणी असणं आवश्यक आहे.
गेल्यावर्षी ३ मे पर्यंत या धरणांमध्ये ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. असं असलं तरी या पाणीसाठ्यातून जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचं नियोजन महापालिकेनं केलं आहे.
सध्या मुंबईत १० टक्के पाणीकपात सुरू आहे. पाऊस लांबल्यास जूननंतर राखीव पाणीसाठ्यातून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जाईल. महापालिकेने राज्य सरकारकडून भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठ्याचा वापर करण्याची परवानगी घेतली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर आणखी पाणीकपात लादण्यात येणार नाही.
७ धरणातील पाणीसाठी
पिण्यायोग्य पाणीसाठा
तलाव | २०१९ | २०१८ |
---|---|---|
अप्पर वैतरणा | ९५९ | |
मोडक सागर | ४४२७१ | ६४३९४ |
तानसा | २९३७४ | ३५७९३ |
विहार | ३४८१ | ८८१६ |
भातसा | ११८८३२ | १७८९७६ |
तुळशी | २८७८ | ३०५५ |
मध्य वैतरणा | ४३२५६ | १३६७४३ |
हेही वाचा-
मुंबईवर पुन्हा एकदा पाणी कपातीची टांगती तलवार?
मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट? २७ टक्केच पाणीसाठा शिल्लक