Advertisement

‘वीज कनेक्शन तोडणी’ला ताबडतोब स्थगिती; अजित पवारांची विधानसभेत मोठी घोषणा

शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

‘वीज कनेक्शन तोडणी’ला ताबडतोब स्थगिती; अजित पवारांची विधानसभेत मोठी घोषणा
SHARES

कोरोना संकट आणि लाॅकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून भाजपने सत्ताधाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडलं. अखेर शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज सुरू होण्याआधी भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केलं. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत भाजपनं या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला. सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कंपन्यांकडून सुरू असलेली कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपनं केली.

हेही वाचा- मुंबईतील ‘बत्ती गुल’ मागे चीनचा हात?, ऊर्जामंत्र्यांनीही व्यक्त केला संशय

त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला. “वाढीव वीज बिल न भरल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची वीज कनेक्शन कापली जात आहेत. कोरोनामुळे आधीच संकटात आलेल्या जनतेला आणखी अडचणीत आणलं जात आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या विषयावर चर्चा घेण्याची मागणी केली. 

त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्य सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो की, जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे, घरगुती ग्राहकांचं वीज कनेक्शन तोडणं ताबडतोब थांबण्यात येईल. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची इच्छा आहे. त्यामुळे एक दिवस ठरवून या विषयावर चर्चा करू. चर्चेतून सगळ्या सदस्यांचं समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील कुठलेही निर्णय घेण्यात येतील,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

(stay on electricity connection cut in maharashtra ajit pawar announced in assembly budget session)

हेही वाचा- मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात, न्यूयॉर्क टाइम्सचा दावा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा