बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ भरून वाहू लागला आहे. १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तलाव पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता.
बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरुन वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांत मिळून सध्या केवळ १८ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती समोर येत आहे. पावसानं पाठ फिरवल्यामुळे गेल्या २-३ दिवसांपासून पाणीसाठा खालावू लागला आहे. अपर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असतो.
या सातही धरणांत मिळून बुधवार, ७ जुलैपर्यंत के वळ दोन लाख ६६ हजार ८४८ दशलक्ष लिटर पाणीसाठा म्हणजे धरणाच्या साठवण क्षमतेच्या केवळ १८.४४ टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात वेळेवर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पाणीसाठा वाढू लागला होता. जूनअखेरीस तुरळक पाऊस आणि मातीतून झिरपत आलेल्या पाण्यामुळे तलावातील पाणीसाठा काही प्रमाणात वाढत होता.
हेही वाचा