पावसाळा सुरू असतानाही मुंबईत मेट्रोच्या कामासाठी खोदकाम सुरुच आहे. त्यामुळे हे खोदकाम त्वरीत बंद करण्याची मागणी शिवसेनेकडून झाली होती. त्यानंतर आता खुद्द महापौरांनी शिवसेनेच्या महापालिकेतील नेत्यांसह मेट्रोच्या कामाची पाहणी केली. या पाहणीमध्ये मेट्रोच्या खोदकामात पावसाळी पाण्याचा निचरा करणारे मॅनहोल्स आणि चेंबरची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे भविष्यात पाण्याचा निचराच होणार नसून मुंबईची पुन्हा तुंबई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही तोडफोड करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले आहेत.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर आणि रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांच्यासह पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामाची पाहणी केली. यावेळी अंधेरी ते बोरिवलीदरम्यानच्या भागाची पाहणी करताना मेट्रो बॅरिकेट्स उभारलेल्या आतील संरक्षित भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे दिसून आले.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पावसाळी पाण्याचा निचरा करणारे मॅनहोल्स आणि चेंबर हे तुटलेल्या अवस्थेत आहेत. परिणामी रस्त्यावर वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा होणार नसल्यामुळे हे पाणी पुन्हा रस्त्यांवरच तुंबून वाहतूककोंडी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेने आरोप केल्यानंतरही मेट्रोचे काम बंद झाले नसून अनेक ठिकाणी खोदकाम केलेले यावेळी पहायला मिळाले. मात्र, संरक्षित भागात हे खोदकाम असले तरी, आतील भागात कुणीही गेल्यास त्यांना अपाय होण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात आली.
हेही वाचा
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)