येत्या २३ ऑगस्टला मुंबईसह राज्यभरात मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी बकरी ईदनिमित्त मुंबईतील देवनार कत्तलखान्यात बकऱ्यांची कत्तल केली जाते. मात्र यंदा कत्तलखान्याबाहेर बकऱ्यांच्या कत्तीलीला परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी रद्द करण्यात यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
सोमवारी 'जीव मैत्री ट्रस्ट'च्यावतीनं ही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं लवकरच या याचिकेवर सुनावणी देखील होणार आहे. त्यामुळं यंदाच्या बकरी ईदला कमी प्रमाणात बकऱ्यांची कत्तल होण्याची शक्याता आहे.
बकरी ईदनिमित्त मुंबई महापालिका देवनार कत्तलखान्याबाहेर बकऱ्या आणि मेढ्यांच्या कत्तलीसाठी ऑनलाईन परवानगी देत आहे. मात्र ऑनलाइन परवानगी मिळाल्यास सार्वजनिक ठिकाणी बकऱ्यांची कत्तल केली जाईल. त्यामुळं पर्यावरण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. त्याचप्रमाणं पाणीही खराब होईल, अशाप्रकारची भीती 'जीव मैत्री ट्रस्ट'ने या याचिकेत व्यक्त केली आहे.
तसंच कत्तलखान्याबाहेर बकऱ्यांची कत्तल करणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचे आदेश, पर्यावरणाचे कायदे, मार्गदर्शक तत्व आणि प्राण्यांविषयाचे कायदे याचं उल्लंघन होईल, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.
देवनार कत्तलखान्यात बकऱ्यांच्या कत्तलीनंतर त्यांच्या आवशेषांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था अाहे. मात्र कत्तलखान्याबाहेर तशी सुविधा नसल्यामुळं कत्तलखान्याबाहेर बकऱ्यांची कत्तल करण्यास परवानगी नको, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
हेही वाचा-
मुंबईच्या चौपाट्यांवर जाताना जपून, आल्यात विषारी जेली फिश!
जुन्या कागदपत्रांचं स्कॅनिंग करण्यात 'नेट स्पायडर' ठरला फेल!