विराट कोहलीचा भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला असून तिथे न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना, तसेच इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, त्याचवेळी भारताचा दुसरा संघ पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि यजमान श्रीलंकेत ३ एकदिवसीय व ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.
भारतीय संघाच्या या श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात होणार असल्याची घोषणा प्रसारक सोनीने केली. भारताचे बहुतांश प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर गेले असल्याने श्रीलंकेत भारताचे दुसऱ्या फळीतील खेळाडू खेळतील. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची लवकरच निवड होणे अपेक्षित असून कर्णधारपदासाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात स्पर्धा आहे.
फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट झाल्यास त्याचाही कर्णधार म्हणून विचार केला जाऊ शकेल. या संघात भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल यांसारख्या अनुभवी खेळाडूंसह पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, राहुल चहर यांसारख्या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरुवात होईल. एकदिवसीय मालिकेतील तीन सामने १३, १६ आणि १८ जुलैला, तर टी-२० मालिकेचे सामने २१, २३ आणि २५ जुलैला खेळले जातील. परंतु, सामन्यांचे ठिकाण अजून निश्चित झालेले नाही. या दौऱ्यासाठी राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवणार आहे.
हेही वाचा -