मुंबईत २६/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी निघून गेले आहे. या हल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक उपाय योजना केल्या खऱ्या मात्र त्याची काळजी घेताना पोलिस दलाकडून हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने अमेरिकेकडून खरेदी केलेले मोबाईल स्कॅनर व्हेईकल आता भंगारात काढण्याची वेळ आली आहे. तब्बल ७ कोटी रुपयांच्या या मोबाईल स्कॅनर व्हेईकलची दुरुस्ती न केल्यामुळे या गाडीतील सर्व स्कॅनर निकामी झाले आहेत तर, या व्हॅनला गंज चढल्याने, अखेर मुंबई पोलिसांनी हे वाहन भंगारात काढण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे.
हेही वाचाः- मोर्चाला पोलिसांचा नकार तरीही मोर्चा काढणार; मनसे कार्यकर्ते ठाम
२६/११ च्या हल्ल्यानंतर नेमण्यात आलेल्या राम प्रधान समितीने तत्कालीन राज्य सरकारला शहर तसेच राज्याच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचा अहवाल सादर केला होता. या अहवालात त्यांनी मुंबई पोलिसांना अमेरिका आणि ब्रिटन पोलिसांच्या धर्तीवर अत्याधुनिक करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री खरेदी करणे आवश्यक असल्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार सरकारने २००९ मध्ये अमेरिकन कंपनीकडून मोबाईल स्कॅनर व्हेईकलची ७ कोटी रुपयांना खरेदी केली होती. या व्हेईकलचे वैशिष्ट्य म्हणजे या गाडीत १४ पोर्टेबल एक्स-रे स्कॅनर असून हे स्कॅनर मुंबई पोलिसांच्या बाॅम्बनाशक पथकातील १४ गाड्यांना जोडण्यात आले आहेत. ही गाडी रस्त्याने निघाली असता तिच्यापासून १०० मीटर परिघात एखाद्या ठिकाणी अथवा गाडीत संशयास्पद वस्तू अथवा बॉम्बसदृश बाबी आढळल्यास ती तात्काळ धोक्याचे संदेश देते. त्यामुळे अशा स्फोटक वस्तू अथवा बाॅम्ब शोधून ते निकामी करता येतात.
हेही वाचाः-लँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यासाठी जानेवारीपासून नवा नियम
मात्र, या गाडीच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठीचा प्रत्येक वर्षी अडीच कोटींचा खर्च असून हे सर्व करण्यासाठी एकही कंपनी आपल्या देशात नाही. त्यामुळे याचे वार्षिक कंत्राट बाहेरच्या कंपनीला द्यावे लागणार आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी तत्कालीन राज्य सरकारला वेळोवेळी प्रस्ताव देखील पाठवला होता. मात्र, राज्य सरकारने यावर साधा विचारविनिमयही केला नव्हता. शिवाय याप्रकरणी राज्य सरकारने मुंबई पोलिसांना पत्रव्यवहारसुद्धा केला नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. दरम्यान, राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली याबाबत अनेक प्रस्ताव पाठविले होते. या प्रस्तावामध्ये माक्र्समॅन व्हॅनच्या दुरुस्तीचा खर्च तसेच मोबाईल स्कॅनर व्हेईकलचा खर्च नमूद केला होता. मात्र, त्यावर पुढे काहीही झाले नाही. तर दुसरीकडे या व्हॅन मधील सर्व स्कॅनर बंद पडले, असून, या व्हॅनला गंज चढला आहे. सध्या याची दुरुस्ती करण्यास एवढा खर्च आहे की, या पैशात अशाच प्रकारची नविन व्हॅन येऊ शकते. त्याुळे ही मशीन सध्या पोलीस मुख्यालयात धुळखात पडल्याचे आढळत आहे.