मुंबईकरांची लाइफलाइन असलेली रेल्वे मोबाइल चोरांसाठी 'कुरण' ठरत आहे. लोकल असो किंवा एक्सप्रेस... प्रवाशांच्या गर्दीत मोबाइल चोरी जोरात सुरू असते. अवघ्या तीन महिन्यात मध्य रेल्वे मार्गावर चोरीच्या एकूण ५ हजार ९०८ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मोबाइल चोरीला गेले आहेत. या भुरट्या चोरांचा माग काढण्यासाठी सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीवेळी महाराष्ट्र सुरक्षा बल आणि रेल्वे लोहमार्ग पोलीस यांच्या सहकार्याने तपासणी सुरू आहे.
मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत सुमारे ५ हजार ९०८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी फक्त १७७ तक्रारींचे निवारण करण्यात पोलिसांना यश आलं आहे. जानेवारी २०१९ मध्ये चोरीच्या २ हजार १४० गुन्ह्यांची नोंद झाली असून यापैकी ४७ तक्रारींचे निवारण करण्यात आलं आहे. तर फेब्रुवारी २०१९ मध्ये १ हजार ९४७ गुन्ह्यांची नोंद झाली असून यापैकी ६० तक्रारींचं निवारण झालं आहे. तसंच मार्च २०१९ मध्ये १ हजार ८२१ गुन्ह्यांची नोंद झाली असून यापैकी ७० तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. मागील दोन वर्षांत मौल्यवान वस्तू, प्रवासी साहित्य, मोबाइल, बॅग आणि पाकीट अशा वस्तू चोरीला जाण्याची संख्या वाढली असून जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१८ या दोन वर्षांत एकूण ३७ हजार ३०२ गुन्ह्यांची नोंद केली आहे.
२०१८ मध्ये २२ हजार ५२५ गुन्ह्यांपैकी ६५५ गुन्ह्यांचा तपास लागला असून त्यात ७५२ जणांना पकडण्यात आले. तर २०१७ मध्ये १४ हजार ७७७ गुन्ह्यांपैकी ८६४ गुन्ह्यांचा तपास लागला असून ९९७ जणांना पकडण्यात आलं आहे. तसंच २०१९ मार्चपर्यंत एकूण ५ हजार ९०८ गुन्ह्यांपैकी १७७ गुन्ह्यांचा तपास करण्यात आला आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ या महिन्यांत ५६ जणांना पकडण्यात आले आहे.
हेही वाचा -
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना जुहूच्या हॉटेलमधून अटक
एका सेल्फीसाठी स्वतःच्या जीवाशी खेळू नका, मुंबई पोलिसांचे आवाहन