मुंबईतील १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेम याला गुरूवारी टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ताहीर मर्चंट आणि फिरोज खान या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याचा तब्बल २४ वर्षांनंतर म्हणजेच १६ जून २०१७ रोजी निकाल लागला होता. निकाल देताना न्यायालयाने बॉम्बस्फोटाचा कट रचणे, त्याचबरोबर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली सहा जणांना दोषी ठरवले होते. या सहाजणांपैकी मुस्तफा डोसा याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने गुरूवारी टाडा न्यायालयाने उर्वरीत पाच जणांना शिक्षा सुनावली. यापैकी ताहीर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा, सालेम आणि करीमुल्ला खान या दोघांना जन्मठेपेसह दोन लाखांचा दंड तसेच रियाज सिद्दीकिला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
अबू सालेमवर जे आरोप सिद्ध झाले त्या आरोपांमध्ये त्याला फाशीची शिक्षा होणे अपेक्षित होते. मात्र पोर्तुगालसोबत झालेल्या प्रत्यार्पण करारामुळे सीबीआयचे वकील जी. एस. सानप यांनी सालेमला जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली होती. सीबीआयची मागणी ग्राह्य धरत विशेष टाडा न्यायालयाने सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली असली, तरी पोर्तुगाल सरकारशी झालेल्या करारानुसार सालेमला जास्तीत जास्त २५ वर्षांचीच शिक्षा देता येणार आहे. सालेमचे २००५ साली पोर्तुगालावरून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. सालेम २००५ पासून तुरूंगात आहे. त्यामुळे २००५ पासून आतापर्यंत त्याने भोगलेली शिक्षा २५ वर्षांच्या शिक्षेतून वजा होऊ शकते. एवढेच नव्हे, तर पोर्तुगालच्या तुरूंगात प्रत्यार्पण करण्याअंतर्गत देखील तो २८ दिवस तुरूंगात होता. ही शिक्षाही त्याच्या शिक्षेतून वजा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
१९९३ बॉम्बस्फोट : आरोपींना शिक्षा ७ सप्टेंबरला
बॉम्बस्फोटातील दोषींना कठोर शिक्षा करा!
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)