एल्फिन्स्टन (प्रभादेवी) स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर सर्व रेल्वे स्थानकातील आणि स्थाकाबाहेरी परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, अद्याप पश्चिम व मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील फेरीवाल्यांचा उच्छाद अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या ९ महिन्यांत फेरीवाल्यांविरोधात केलेल्या कारवाईत २२ हजार गुन्हे दाखल झाल्याचं समजतं. कल्याण, ठाणे, दादर, कुर्ला, बोरिवली, अंधेरी, डहाणूत या स्थानकात सर्वाधिक कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे.
मागील ९ महिन्यांत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील फेरीवाल्यांच्या विरोधात १० हजार २३२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कल्याणमध्ये सर्वाधिक १ हजार ६७३ गुन्हे दाखल झाले आहेत. ठाण्यात ८१३, कुर्ल्यात ४५७ कारवाई करण्यात आली. त्याशिवाय, पश्चिम रेल्वे मार्गावर १२ हजार १५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. बोरिवलीत १ हजार २०७ गुन्हे, अंधेरीत ७१२, डहाणू रोडअंतर्गत १ हजार ४२४ आणि दादरमध्ये २८४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
पश्चिम रेल्वे
वर्ष | गुन्हे | दंडाची रक्कम | कारावास |
२०१७ | १२,९०२ | १ कोटी ८ लाख ४२ हजार ६८० | १५ |
२०१८ | १२,७६४ | ८७ लाख १७ हजार ४३० | ११ |
२०१९ | १२,०१५ | ४९ लाख ६२ हजार ९७० | ७९ |
मध्य रेल्वे
वर्ष | गुन्हे | दंडाची रक्कम | कारावास |
२०१७ | २२,६६७ | १ कोटी ३४ लाख ३६ हजार २९० | ५८७ |
२०१८ | १२,१९० | १ कोटी १ लाख ७२ हजार ४९० | २०८ |
२०१९ | १०,२३२ | ९० लाख ४२ हजार ५४० | ३२ |
हेही वाचा -
भाजपा-शिवसेना राज्यत ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरे
वर्ल्ड हंगर डे : मुंबईतील या ५ संस्थांना करा अन्नदान आणि व्हा चांगल्या कामाचे भागीदार