काळवीट शिकारप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेला बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याला अखेर २ दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर शनिवारी सलमानला जामीन मंजूर केला. सलमानला जामीन मिळताच त्याच्या देशभरातील चाहत्यांनी एकच जल्लोष केला, तर अनेक ठिकाणी फटाके फोडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं.
जामीन मिळाल्यानंतर सलमान तुरूंगाबाहेर येणार असला, तरी त्याला ७ मे रोजी पुन्हा जोधपूर पोलिसांपुढे हजर रहाण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. शिवाय त्याला भारताबाहेर जाण्यासही न्यायालयाने मनाई केली आहे.
शुक्रवारी रात्री अचानक राजस्थानमधील ८७ न्यायाधीशांची बदली झाली. त्यामध्ये सलमानच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायधीशांचाही समावेश होता. त्यामुळे सलमानला शनिवारी जामीन मिळणार हे स्पष्टच झालं होतं.
काळवीट शिकार प्रकरणातील अन्य कलाकरांची संशयाच्या आधारे निर्दोष मुक्तता करत जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला बुधवारी ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. यावेळी जोधपूरमध्ये निकालाच्यावेळी सलमान याच्यासह अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते.
वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १-२ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांना ठार मारलं होतं. २० या प्रकरणी बिष्णोई समाजातील लोकांनी सलमानसह इतर सहआरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल करण्यात केला होता. त्यावेळी सलमानवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा-
'या' कारणामुळे सलमान दोषी आढळला