दाऊद इब्राहिमच्या टोळीचं खच्चीकरण करण्यास मुंबई पोलिसांनी सुरूवात केली आहे. मुंबईच्या खंडणी विरोधी पथकानं बुधवारी दाऊदचा पुतण्या आणि इकबाल कासकरचा मुलगा रिझवान इकबाल कासकरला अटक केली आहे. एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचाही हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळ काढण्याआधीच विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिसरा आरोपी अश्फाक टॉवलवाला यालाही अटक केली आहे.
बांधकाम आणि चीन व दुबईहून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात करणाऱ्या व्यावसायिकानं ही तक्रार केली होती. त्यानं ३ वर्षांपूर्वी अश्फाक रफिक टॉवलवाला याच्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. व्यावसायिकाला अश्फाककडून १५ लाख ५० हजार रुपये येणं होतं. त्यासाठी त्यानं अनेकदा मागणी केली होती. त्यामुळे अहमद राजा अफ्रोज वधारियानं १२ जूनला व्यावसायिकाला धमकीचा फोन केला. यावेळी वधारियाने आपण दाऊद इब्राहिम आणि फहिम मचमच याचा हस्तक असल्याचं सांगून धमकावलं. तसंच, इक्बाल कासकरचा मुलगा रिझवान यानंही त्या व्यावसायिकाला धमकावलं. रिजवानने टॉवलवालाकडून पैशाची मागणी करू नकोस, अशी धमकी तक्रारदार व्यावसायिकाला दिली . त्यानंतर, १३ आणि १६ जूनला व्यावसायिकाला आलेले हे धमकीचे फोन त्यानं रेकॉर्ड करून या तिघांविरोधात मुंबई पोलिसांकडं तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत दुबईवरून परतल्यानंतर वधारियाला अटक केली.
अहमदला मुंबई विमानतळावर अटक झाल्याची बातमी डी कंपनीत पसरल्यानंतर रिझवानच्या मनात धडकी भरली. पोलिस कोणत्याही क्षणी दरवाजावर येऊन पोहचतील या भितीने बुधवारी रात्री तो मिळेल त्या विमानाने दुबईला पळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांनी वेळीच रिझवानच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रिझवानच्या अटकेमुळं डी कंपनी हादरली असल्याचं सांगितलं जातं आहे.
हेही वाचा -
‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ मोहिमेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
‘आयडॉल’च्या अनेक विद्यार्थ्यांना कला शाखेच्या प्रथम वर्षांच्या परीक्षेत शून्य गुण