मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त शिक्षण केंद्राच्या (आयडॉल) कला शाखेच्या प्रथम वर्षांच्या परीक्षेत शेकडो विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या बीएच्या प्रथम वर्षाच्या निकाल जाहीर झाला होता. या निकालामध्ये तब्बल २३६ विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये शून्य गुण मिळाले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा आयडॉल आणि विद्यापीठाच्या परीक्षा चर्चेत आल्या आहेत.
या निकालामुळं नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या तसंच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून पुढील शिक्षणासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. तसंच, निकालात झालेल्या या गुणगोंधळामुळं अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत, त्यांच्याकडून पेपर पुनर्मूल्यांकनाचं शुल्क न घेण्याची मागणी केली आहे.
'आयडॉल'नं एप्रिल-मेमध्ये घेतलेल्या प्रथम वर्ष बीए परीक्षेसाठी सात हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. परीक्षेचा निकाल ४३ टक्के लागला असून, परीक्षेत तब्बल २३६ विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये शून्य गुण मिळाले आहेत. त्यापैकी २१३ विद्यार्थ्यांना एका विषयात शून्य गुण मिळाले आहेत. तर १८ विद्यार्थ्यांना २ विषयांत, ४ विद्यार्थ्यांना ३ विषयांत व एका विद्यार्थ्याला ४ विषयांत शून्य गुण मिळाले आहेत. त्यामुळं प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवल्यानंतरही शून्य गुण कसे मिळू शकतात असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
'अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण, दोन गुण मिळाले आहेत. विद्यापीठानं पुनर्मूल्यांकनाचे शुल्क न घेता या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा अन्यथा विद्यापीठाविरोधात आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा स्टुडंट लॉ काऊन्सिलचे अॅड. सचिन पवार यांनी दिला आहे.
'प्रथम वर्ष बीए परीक्षेला एकूण ५०९० विद्यार्थी बसले होते. सर्वच विषयांत विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळालेले नाहीत. जर विद्यार्थी निकालाबाबत असमाधानी असेल तर ते पुनर्मूल्यांकन व छायाप्रतीसाठी अर्ज करू शकतात. या विद्यार्थ्यांचे निकाल प्राधान्याने जाहीर करण्यात येतील', अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे यांनी दिली.
हेही वाचा -
कोस्टल रोड प्रकल्पाबाबत महापालिका सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता
मुंबई सेंट्रल येथील टॅक्सी चालकांवर आरपीएफची कारवाई