मुंबईत इतर गुन्हे मोठ्या प्रमाणात रोखण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. मात्र, अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून होणारे गुन्हे रोखण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य ती पावलं उचलली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहरात सोनसाखळी आणि इतर महत्वांच्या गुन्ह्यांना रोखण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. या गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालं असलं तरी सायबर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारे गुन्हे हे गंभीर आहे. हे गुन्हे सोडवण्यासाठी पूर्वी पोलिसांकडे अत्यावश्यक अशा सुविधा नव्हत्या. मात्र मागील १० वर्षाच्या तुलनेत पोलिसांकडे सर्व महत्वांच्या सुविधा असून पोलिस ठाणे पातळीवरही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. त्यामुळे भविष्यात याच सुविधाचा वापर करून सायबर गुन्हे रोखण्यावर सर्वाधिक भर दिला जाणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं.
मुंबईला चहबाजूने समुद्राने वेढलं असून सागरी सुरक्षेवरदेखील विशेष भर दिला जाणार आहे. सागरी पोलिस ठाणी आहेतच. मात्र, याच पोलिस ठाण्यांना अत्यावश्यक अशा सुविधा देऊन त्यांचं बळ वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईत बुधवारी मराठा मोर्चादरम्यान शहरात असलेल्या चोख पोलिस बंदोबस्तामुळे आंदोलनाला कुठंही हिंसक वळण मिळालं नाही. नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात पोलिसांना सहकार्य केलं. मुंबई पोलिस दलात असलेल्या अधिकाऱ्यांकडं असं मोर्चे आणि आंदोलनं हाताळण्याचं कसब असल्याचंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
वाशीच्या खाडीत मुलाची अात्महत्या
भांडुपमध्ये कॉलेजमध्ये घुसून विद्यार्थ्याची हत्या