कुख्यात गुंड रवी पुजारीचा भाऊ प्रसाद पुजारी आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. ५७० पानी हे आरोपपत्र असून त्यात १२ जणांचे पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी प्रसादच्या दोन्ही साथीदारांना अटक केली असली, तरी प्रसाद हा अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दक्षिण मुंबईत पोपटलाल पोरवाल आणि त्यांचा भागीदार सन २००४ पासून एकमेकांना ओळखतात. या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. भागीदाराकडे बारा कोटी रुपये येणे असून तो देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार पोरवाल याने पोलिसांत केली होती. याबाबत तपास सुरू असताना त्याच्या भागीदाराला धमकीचे फोन येऊ लागले. पोरवाल यांचे पैसे तत्काळ देऊन टाक आणि चार कोटी रुपये दे, अशी धमकी प्रसाद पुजारी याने दिली. या धमकीनंतर व्यावसायिक भागीदाराने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. भागीदाराकडून थकविलेले पैसे वसूल करण्यासाठी व्यावसायिक पोपटलाल पोरवाल याने पुजारी टोळीला सुपारी दिली होती.
तपासामध्ये पोरवाल याचा सहभाग असल्याचे उघड होताच पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात मितेश शहा याचाही सहभाग आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात अखेर ५७० पानांचे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात १२ जणांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. त्यात पोरवाल आणि पुजारी याच्या मोबाइलच्या सीडीआरची माहितीही असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -
वडाळा पोलिसांची मृत्यूच्या छायेतील दहा वर्ष संपली
महाराष्ट्रातील २८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या