मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी स्थानकावर शुक्रवारी बाॅम्ब ठेवण्यात आल्याच्या निनावी फोननं सुरक्षा यत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र पोलिसांच्या तपासणीनंतर स्थानक परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळं पोलिसांसह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेत स्फोट घडवणार असल्याच्या पत्रानं एकच खळबळ उडाली असताना देशातील प्रमुख शहरांना सतर्कतेचा इशारा शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांनी दिला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अनोळखी व्यक्तीनं रेल्वेच्या हेल्पलाईनवर फोन करून मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकात बाॅम्ब ठेवला असल्याचा फोन केला.
रेल्वे पोलीस आणि आरपीएफ पोलिसांनी स्थानकाच्या दिशेनं धाव घेत शोधकार्य सुरू केलं. डाॅग स्काॅड आणि बाॅम्बशोधक यंत्रणांसह पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. कुणीतरी अफवा पसरवण्यासाठी असा निनावी फोन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून ही अफवा पसरवणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा -