आधी बसायला खुर्ची, आता होतेय हडतुड..२६/११ हल्ल्यातील शहीदाच्या पत्नीची शोकांतिका


आधी बसायला खुर्ची, आता होतेय हडतुड..२६/११ हल्ल्यातील शहीदाच्या पत्नीची शोकांतिका
SHARES

"आधी सरकारी अधिकारी आम्हाला त्यांच्या खुर्चीवर बसवायचे. पण आता हडतुड करतात". हे उद्वेगपूर्ण उद्गार आहेत मुंबई हल्ल्यात आपला पती गमावलेल्या एका पत्नीचे..आणि आजारपणात आपला तरूण मुलगा गमावलेल्या एका आईची!

सायनमध्ये रहाणाऱ्या उघडे कुटुंबाने २६/११च्या मुंबई हल्ल्यात घरातला एकुलता एक कमावता पुरूष गमावला. कामा हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक असलेले बबन उघडे शहीद झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुशीला उघडे आणि तीन मुलं असा परिवार होता. काळाचा घाला सोसणाऱ्या या परिवाराला सरकारनं इतरांप्रमाणेच मदतीचा हात दिला. घरातल्या सर्वात मोठा मुलगा विलास उघडेला सरकारनं कामा हॉस्पिटलमध्येच नोकरी दिली.



नियतीला हवा होता वेगळाच न्याय...

मोठ्या मुलाला नोकरी मिळाल्यामुळे बबन उघडेंच्या मृत्यूचं दु:ख कुटुंबाने पचवलं आणि परिस्थितीचा सामना सुरु केला. मात्र नियतीला काहीतरी वेगळंच हवं होतं. नोकरी लागल्यानंतर अवघ्या ५व्या वर्षी मोठा मुलगा विलास उघडे दीर्घ आजाराने मरण पावला.


दुसऱ्या मुलाला नोकरीचं आश्वासन, पण नोकरीच नाही!

दरम्यान, मुलाच्या निधनानं खचलेल्या सुशीला उघडेंनी आपल्या इतर दोन मुलांपैकी एकाला नोकरी लागण्यासाठी अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या. शासन दरबारी शेकडो फेऱ्या मारल्या. २०१३ साली दुसऱ्या मुलाला नोकरी देण्याचं लेखी आश्वासनही त्यांना सरकारने दिलं. पण आज चार वर्ष झाली, तरी त्यांच्या मुलाला आजतागायत नोकरी मिळालेली नाही. विशेष म्हणजे शासनाने 'ड' प्रवर्गात विलास यांच्या भावाला नोकरी लावण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचंही सांगितलं होतं.



परिस्थिती सुधरेना, अश्रू काही थांबेनात!

आजही घरच्या परिस्थितीबाबत विचारल्यावर सुशीला यांच्या डोळ्यांतून अश्रू येतात. त्या म्हणतात, "दरवर्षी रडण्याची पाळी येते. घरात कोणी कमावणारा नाही आणि दुसऱ्या मुलाला नोकरी देण्याचं कबूल करून देखील चार वर्ष झाली, अद्याप नोकरी नाही." "पोलिसांच्या कुटुंबांना पेट्रोल पंप देण्यात आले, मग आम्हाला का नाही? माझा नवरा देखील हातात काठी घेऊन सुरक्षा करत होता. मग आमच्याबरोबर हा दुजाभाव का?" असा थेट सवालच ललिता यांनी सरकारला विचारला आहे.


आधी बसायला खुर्ची, आता होते हडतुड

सरकारदरबारी होणारा अपमान सांगताना सुशीला म्हणतात, "आधी साहेब लोकं आम्हाला त्यांच्या खुर्चीवर बसायला द्यायचे. पण आता हल्ल्याच्या ९ वर्षांनंतर हडतुड करतात. शासनाने आम्हाला दगा दिला आहे.

आधी कमावत्या पतीच्या आणि आता कमावत्या मुलाच्या पश्चात घरात कोणी कमावणारा नसताना घराचा गाडा कसा आखायचा? याचा प्रश्न सुशीला यांना रोज पडल्याशिवाय राहत नाही. उघडे कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न दिसतो...आमच्या पोटाला सुखाचा घास मिळणार कधी?



हेही वाचा

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद सुटला


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा