महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून, या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसले आहेत. सकाळी ११ वाजता राज्यातील २ हजार ९५७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट देण्यात आलं आहे.
यंदा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळानं २५२ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्याशिवाय पेपर लीक होण्याच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या मोबाईलवर बंदी घालण्यात आली असून, बारावीच्या परीक्षेदरम्यान सर्व शिक्षकांनी मोबाईल फोन केंद्र संचालकांकडे जमा करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
ही परीक्षा २० मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान यंदा बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागीय मंडळाचे एकूण ३ लाख, ३५ हजार, ४२८ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यात वाणिज्य (कॉमर्स) शाखेतून सर्वाधिक १ लाख ८५ हजार ७७४ विद्यार्थी, विज्ञान शाखेतून ९१ हजार १७८ विद्यार्थी, कला शाखेतून ५४ हजार ०५६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तसंच M.C.V.C या शाखेतूनही ४ हजार ४२० विद्यार्थी बसले आहेत.
यंदाच्या परीक्षेत मुंबईतील सोफिया कॉलेजमध्ये शिकणारी निष्का नरेश हसनगडी ही दिव्यांग विद्यार्थिनी आय-पॅडवर परीक्षा देणार आहे. निष्का जन्मतः बोलू शकत नसून ती आठ वर्षांची असताना तिच्या उजव्या हाताच्या हालचालींवरही मर्यादा आली. यामुळे तिच्या आईने तिला बारावीची परीक्षा आयपॅडवर देण्याची मुभा मिळावी, अशी विनंती तिची आई रश्मी हसनगडी शिक्षण मंडळाला केली होती. दरम्यान निष्काने इयत्ता दहावीमध्येही 'एनआओएस'मधून आयपॅडवर परीक्षा दिली होती. त्यानुसार बारावीतही तिला मुभा देण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे प्रथमच अशा प्रकारे आयपॅड वर परीक्षा घेण्यात येणार आहे.
क्रं. | जिल्हा | विज्ञान | कला | वाणिज्य | M.C.V.C | एकूण विद्यार्थी संख्या |
१. | ठाणे | २७ हजार ८७९ | १६ हजार ८४४ | ५० हजार ०६८ | ८५६ | ९५ हजार ६४७ |
२. | पालघर | ११ हजार १७२ | १२ हजार ३६१ | १९ हजार ८२५ | ५३८ | ४३ हजार ८९५ |
३. | रायगड | १० हजार ४९२ | ८ हजार ८९४ | १२ हजार २९० | ७८३ | ३२ हजार ४५९ |
४. | मुंबई (दक्षिण) | ११ हजार १४१ | ६ हजार ७२९ | २६ हजार ३४७ | ५५२ | ४४ हजार ७६९ |
५. | मुंबई (पश्चिम) | १९ हजार ०८९ | ५ हजार ०९७ | ५० हजार २७० | ८४८ | ७५ हजार ३०४ |
६. | मुंबई (उत्तर) | ११ हजार ४०५ | ४ हजार १३१ | २६ हजार ९७४ | ८४४ | ४३ हजार ३५४ |
एकूण | ९१ हजार १७८ | ५४ हजार ०५६ | १ लाख ८५ हजार ७४४ | ४ हजार ४२० | ३ लाख ३५ हजार ४२८ |
हेही वाचा -
आर्चीला ‘ऑल दी बेस्ट’ केलं का?