राज्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १ ते १५ सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं घेतला आहे. या माध्यमातून शाळा, शाळांचा परिसर, घरांमध्ये स्वच्छता व स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. तसंच स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतींचा वापर करण्यासही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून करण्यात येणार आहे. या पंधरवड्याच्या निमित्तानं सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांना स्वच्छतेची शपथ देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांनी पंधरवड्यातील पहिल्याच आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, पालक आणि शिक्षकांमध्ये या उद्देशासाठी बैठक आयोजित करणं अपेक्षित असणार आहे. या पंधरवड्यात शिक्षकांनी शाळेतील, शैक्षणिक संस्थांमधील स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी करावी. तसच आवश्यकता असल्यास या सुविधांच्या देखभाल दुरूस्तीसाठी प्रस्ताव योजना तयार करून या विषयावर विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित करावी असही शालेय शिक्षण विभागानं निर्णयात म्हटलं आहे.
अनेक शाळा व शैक्षणिक संस्थांच्या आवारात जुन्या, वापरात व गरज नसलेल्या आणि अडगळ ठरत असलेल्या अनावश्यक कागदपत्रांची जुन्या फाईल्स काढून टाकावीत. तसचं जर शाळेच्या आवारात मोडके फर्निचर, निरूपयोगी उपकरणं, नादुरूस्त वाहनं, नियमानुसार मोडीत काढून सर्व टाकाऊ सामान टाकून द्यावेत. त्याशिवाय या पंधरवड्यापासून ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी जागृती निर्माण करण्याचं कामही शाळेमार्फत करण्यात यावं, असं सांगण्यात आलं आहे.
तसचं आवश्यकता असल्यास या कामासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मदत घ्यावी. शाळा व शिक्षण संस्थांमध्ये या पंधरवड्यात राबविण्यात आलेले विविध उपक्रम केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या शगुन पोर्टलवर अपलोड करावीत असंही शालेय शिक्षण विभागाच्या यासंबंधीच्या निर्णयात म्हटले आहे.
हेही वाचा -
मेडिकल प्रवेशासाठी ‘डोमिसाइल’च्या अटी योग्यच - सर्वोच्च न्यायालय
दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 'नो होमवर्क'