शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये अकरावीत प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी तब्बल साडेनऊ हजार जागांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई विभागात यंदा १४ नवीन ज्युनिअर कॉलेजही सुरू होणार आहेत. यावर्षी अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून एकूण ३ लाख १ हजार ७६० जागा उपलब्ध असतील.
दरम्यान वाणिज्य (कॉमर्स) शाखेच्या सर्वाधिक ४ हजार ४६० जागा वाढल्या आहेत. त्याशिवाय विज्ञान (सायन्स) शाखेच्या ३ हजार ७६० तर कला (आर्ट्स) शाखेच्या १ हजार १४० जागा वाढल्या आहेत. एमसीव्हीसीच्या जागांमध्येही ३१० ने वाढ झाली असून यंदा ऑनलाइन प्रक्रियेसाठी १ लाख ६३ हजार ९४६ जागा उपलब्ध असतील. दरम्यान ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत ४ हजार २६४ ने वाढली आहे.
सध्या राज्यात दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी ऑनलाइन प्रक्रियेतील पहिला भाग भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासबोतच दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन, म्हणजे कॉलेजांचे पर्याय भरण्याची प्रक्रिया सुरू करता येणार आहे.
या ऑनलाइन प्रक्रियेसाठी मुंबई विभागातील कॉलेजांमधील जागा मंगळवारी जाहीर करण्यात आल्या. दरम्यान यंदा मुंबई विभागातून १४ नवीन ज्युनिअर कॉलेज सुरू करण्यात आली असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील कॉलेज निवडणे शक्य होणार आहे.
यावर्षी प्रथमच बायफोकल शाखेचे प्रवेश ऑनलाइन केलं जाणार असून यामुळे पहिली फेरी सुरू होण्यासाठी शून्य फेरीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. यंदा मुंबई विभागात एकूण ८०० कॉलेजांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती https://mumbai.11thadmission.net/ या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हेही वाचा-
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात
मुंबईच्या १५० गरीब विद्यार्थ्यांना सरकारची १२ हजारांची शिष्यवृत्ती!