आयआयटी मुंबईतील कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आतापर्यंत ११७२ विद्यार्थ्यांना २६५ नामांकीत कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना सर्वाधिक नोकऱ्या मिळाल्या आहेत. इंजिनियरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची यांत सर्वात जास्त संख्या आहे.
आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये १ डिसेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये २६५ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यांत अमेरिका, जपान, अरब अमिराती, सिंगापूर, नेदरलँड, हाँग काँग, तैवान, साऊथ कोरिया या देशातील १५६ कंपन्यांचा सहभाग होता. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीत १३१९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील ११७२ विद्यार्थ्यांची निवड झाली. यातील ११६ विद्यार्थ्यांना मुलाखतीआधीच नोकरी देण्यात आली, तर १०५६ विद्यार्थ्यांची मुलाखतीनंतर निवड करण्यात आली.
हेही वाचा- दरवर्षी घटतेय महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या, निधी वाढवूनही उपयोग नाहीच
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत कंपन्यांकडून ६२.२८ लाखांचं वार्षिक पॅकेज मिळालं तर परदेशी कंपन्यांकडून १.६४ लाख डॉलर इतका वार्षिक पगार देण्यात आला. यावर्षी विद्यार्थ्यांना सरासरी २०.३४ लाख रुपये इतके वार्षिक पगार मिळाले आहेत.
हेही वाचा- 'सीएस' परीक्षेतील २ पेपर ढकलले पुढे, कारण अस्पष्ट