आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी मुंबईतून ३ हजार ५३२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये २ हजार ७८९ राज्य शिक्षण मंडळाच्या, तर ७४३ इतर बोर्डांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ ते २६ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे.
आरटीई प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिली सोडत सोमवारी पुण्यातून जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. राज्यभरात आरटीईच्या एकूण १ लाख १६ हजार ७७९ जागा असून, पहिल्या सोडतीत ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं, मुंबईत उपलब्ध असलेल्या ७ हजार ४९१ जागांसाठी पहिल्या सोडतीत ३ हजार ५३२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आरटीईसाठी मुंबईत एकूण ३५६ शाळांनी नोंदणी केली आहे
दरम्यान, गुरुवारपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तसंच, प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांनी एसएमएस व याद्यांवर अवलंबून न राहता पडताळणी समितीकडं जाऊन प्रवेशाची कार्यवाही सुरू करावी. त्याशिवाय लॉटरी पद्धतीनं ज्या शाळेत पाल्याची निवड झाली आहे त्या शाळेजवळच्याच पडताळणी केंद्रावर जाऊन पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करावी. तसंच, सर्व कागदपत्रांच्या २ प्रती तयार कराव्या. यामधील एक संच पडताळणी समितीकडं व दुसरा संच शाळेत सादर करावा. त्याचप्रमाणं, आपला ऑनलाइन प्रवेश झाल्याची पावती व प्रवेश पत्र आणि इतर कागदपत्रे घेऊन दिलेल्या मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा, असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे.
हेही वाचा -
मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता
पत्नीची हत्याकरून पतीचे पोलिस ठाण्यात आत्मसमर्पन