विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षक आणि पालक अशा दोघांचीही भूमिका महत्त्वाची असून शाळा व्यवस्थापन समिती ही मुख्यत्वेकरून पालकांचं प्रतिनिधित्व करते. शाळा व्यवस्थापन समिती हा घटक सक्षम झाल्यास शाळा विकासात लोकसमुदायाचा सहभाग अधिक वाढेल. त्यातून शिक्षक व पालक सुसंवाद निर्माण होईल आणि १०० टक्के विद्यार्थी प्रगत करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, या उद्देशाने गुणवत्ता विकासासाठी आणि शालेय व्यवस्थापन समित्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी यंदा मुंबईत शिक्षणाची वारी आयोजित करण्यात येणार आहे.
मुंबईतील एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे, पूर्व इथं २८ ते ३० नोव्हेंबर, २०१८ या कालावधीत ही वारी आयोजित करण्यात येणार आहे. यंदा शिक्षणाची वारी’चे चौथं वर्ष असून आतापर्यंत आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीमध्ये अनेक शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी विविध नावीन्यपूर्ण प्रयोगांचा लाभ घेतला आहे.
या टप्प्यातील पहिली वारी मुंबईत होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, वर्धा, नांदेड आणि जळगाव येथे वारीचं आयोजन करण्यात येणार आहे. या शैक्षणिक वारीत रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षक भेट देणार आहेत. ही वारी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व शिक्षणप्रेमींसाठी खुली असणार आहे.
शाळा विकास आराखडा आणि शाळा व्यवस्थापन समिती संरचना, पालकांची शाळांना अध्यापनात/कौशल्य विकासात मदत, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, शालेय पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत.
त्याशिवाय लोकसहभाग, शालेय पोषण आहार, स्थलांतरित आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समितीचा सहभाग, स्वच्छ भारत–स्वच्छ विद्यालय, दिव्यांग मुलांसाठी शिक्षण, गणित आणि भाषा वाचन विकास, कृतियुक्त विज्ञान, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, कला, कार्यानुभव आणि क्रीडा विषयक उपक्रमांचे प्रयोगही इथं मांडण्यात येणार आहेत.
हेही वाचा-
पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना आता 'नो होमवर्क'!
लॉचे विद्यार्थी गोंधळात, पदवी देण्यात विद्यापीठाचा घोळ