मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन पाळण्यात विद्यापीठ सपशेल नापास झाले आहे. कारण अजूनही 3 लाख 25 हजार 729 उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहेत. एकूण 477 निकालांपैकी केवळ 153 निकाल जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल31 जुलैपर्यंत जाहीर करा, अशी तंबी राज्यपालांनी कुलगुरू संजय देशमुख यांना दिली होती.कुलगुरूंनी प्राध्यापकांना अक्षरशः वेठीस धरले. त्यानंतर युद्धपातळीवर कामाला सुरुवात झाली होती. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना एक आठवड्याची सुट्टीही देण्यात आली. मात्र हा सारा अट्टाहास अपयशी ठरला. पण रविवारी सुट्टीच्या दिवशी प्राध्यापकांनी म्हणावा तितका प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रविवारी अखेरच्या दिवशी फक्त 23 हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली. अद्याप तीन लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहे.
सोमवारपर्यंत निकाल लागणार म्हणून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा रविवारी वेबसाईटकडे लागल्या होत्या. मात्र रविवारी फक्त 12 लहान अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा -
पेपर तपासणीचा वाद आला चव्हाट्यावर...
'परीक्षांचे निकाल लावा, अन्यथा आंदोलन करु'