अनेक ऐतिहासिक वारसांपैकी एक असलेलं मुंबई विद्यापीठ. आज बुधवारी १८ जुलै २०१८ ला या विद्यापीठाने १६१ वर्ष पूर्ण केली असून विद्यापीठ १६२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारताच्या सर्वात जुनं विद्यापीठ एक अशी ख्याती असलेल्या मुंबई विद्यापठाची स्थापना १८ जुलै १८५७ मध्ये करण्यात आली.
मुंबई शहर, उपनगरं, ठाणे, रायगड, कोकण, आणि सिंधुदूर्ग या जिल्हयातील जवळपास सर्वच महाविद्यालयं मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून या महाविद्यालयात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
ब्रिटीश अधिकारी डॉ. जॉन विल्सन यांनी १८ जुलै १८५७ रोजी बॉम्बे विद्यापीठाची स्थापना केली. तब्बल १३९ वर्ष बॉम्बे विद्यापीठ असं नाव असलेल्या या विद्यापीठाचं ४ सप्टेंबर १९९६ ला नामांतर करून मुंबई विद्यापीठ असं करण्यात आलं.
मुंबई विद्यापीठासोबतच मद्रास आणि कोलकता या विद्यापीठाची स्थापनाही मुंबई विद्यापीठासोबत करण्यात आली. विशेष म्हणजे डॉ. विल्सन यांच्या पत्नी मार्गारेट बन विल्सन हिने मुंबईत १५ शाळा आणि विल्सन महाविद्यालयाची स्थापना केली. त्याशिवाय मुंबई विद्यापीठाचा कार्य आणि अधिकार ठरवण्यासाठी १९५३ साली मुंबई विद्यापीठ कायदाही अस्तित्वात आला.
सांताक्रूझ आणि फोर्ट या दोन ठिकाणी मुंबई विद्यापीठाची संकुल असून सांताक्रूझ परिसरातील विद्यापीठ संकुल २३० एकर परिसरात वसलेलं आहे. तर फोर्ट या विद्यापीठाच्या संकुलातून विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठात ६० पेक्षा जास्त विभाग असून ८०० पेक्षा जास्त महाविद्यालयं या विद्यापीठातंर्गत येतात.
मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातल्या इमारतीचं बांधकाम हे गॉथिक शैलीत करण्यात आलं आहे. इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा राजाबाई टॉवर असून त्याचं बांधकाम १८७० मध्ये करण्यात आलं आहे.
ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या मुंबई विद्यापीठाला १६१ वर्ष पूर्ण झाली असताना विद्यापीठात बरेच गोलमाल कारभार झालेलं समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेला परीक्षा गोंधळ, पेपर वेळेत न तपासल्यानं निकाल गोंधळ आणि निकाल वेळेत न लागल्यानं विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ… हे कमी काय तर त्यात विद्यापीठाला जवळपास ८ महिने कुलगुरू नसणं, जागतिक क्रमवारीत विद्यापीठाच टॉप ५०० मध्ये नाव नसणं, तसंच नॅक रँकिंगमध्ये झालेली विद्यापीठाची घसरण यांसारख्या एक ना अनेक गोंधळासाठी मुंबई विद्यापीठ प्रसिद्ध आहे.
या सर्व गोंधळानंतर जवळपास ३ महिन्यांपूर्वीच राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी कुलगुरूंची नेमणूक केली. डॉ. सुहास पेडणेकर यांची कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर काही प्रमाणात का होईना गोंधळ थोडा कमी झाला आहे. परंतु, विद्यापीठात अद्याप सुरू असलेलं गोंधळ कमी होणार का, मुंबई विद्यापीठाला जुनं वैभव परत मिळणार का? असे प्रश्न सर्वजण विचारत आहेत.
विद्यापीठाला लाभलेल्या १६१ वर्षांची परंपरा, त्याच्याशी संलग्न असलेलं महाविद्यालय, त्यात शिकणारे विद्यार्थी आणि त्यात सुरू असणारे गोंधळ लवकरात लवकर नष्ट व्हावे आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाला जागतिक दर्जात टॉप १०० मध्ये स्थान लवकरच मिळेल, अशी आपण अपेक्षा करूया.
हेही वाचा -
'लाॅ'च्या निकालातील चूक लपवण्यासाठी फेरपरीक्षेचा घाट!