Advertisement

कधीकाळी अशी होती आमची दिवाळी!

आता सर्वच बदललं. सुखाच्या, आनंदाच्या कल्पनाही बदलल्या. काळाबरोबर हे सारं बदलणारच, पण त्या लहानपणात अनुभवलेल्या दिवाळीचं सुख आताची दिवळी अनुभवताना, नकळतच ‘आमच्या वेळची’ दिवाळी काही औरच आणि जास्त राजस होती असं वाटतं. आम्ही लहान असताना आमच्या आई-वडिलांनाही तसंच वाटत असणार यात शंका नाही. पुढे जाणारी प्रत्येक पिढी आपल्या मागच्या दिवसांत रमलेली असतेच. असं रमलेलं असताना आपण जगतोय, मात्र आताच्या काळात, हे विसरून चालणार नाही. जुन्या आठवणी कायम ठेवून नवीन काळात स्वत:ला रुजवणं आवश्यक आहे.

कधीकाळी अशी होती आमची दिवाळी!
SHARES

माझ्या लहानपणीची दिवाळी खूप छान असायची. माझं लहानपण म्हणजे मला समजू लागल्यापासून समज येईपर्यंतचं वय. नेमकं सांगायचं म्हणजे ६८-६९ सालापासून ते ८०-८५ सालापर्यंतचा काळ. मी तेव्हा अंधेरी पूर्वच्या पंपहाऊस येथील एका बैठ्या चाळीत रहायचो. तेव्हा चाळीला चाळच म्हणत, ‘स्लम’ हा तुच्छतादर्शक शब्द अवतरला नव्हता. माझ्या समोरही अशीच एक बैठी चाळ होती. समोरासमोरच्या दोन्ही चाळीतील मिळून १६ खोल्यांत तीन गुजराती बिऱ्हाडं सोडली, तर बहुतेक सर्व मालवणी आणि मालवणी माणूस म्हणजे मूर्तीमंत उत्साह. चाळीतील खोली म्हणजे, एकूण दीडशे चौ-फुटाच्यावर लांबी, रुंदी असलेल्या खोलीत बसवलेले दोन लहान खण. लांबी-रुंदी-उंची नसूनही तिला खोली म्हणायचे, कारण तिच्यात राहाणारी गरीब माणसं मनाने खोल होती. आतासारखा फ्लॅट उथळपणा तेव्हा कुणाच्यातच नव्हता.


चाळीतलं मनमोकळं वातावरण!

आमच्या चाळीतले बाबालोक कामाला कुठेतरी प्रायव्हेट कंपनीत किंवा मग एसआयसी किंवा पोष्टात. प्रायव्हेटमधे सरकारी नोकरीपेक्षा थोडासा पगार जास्त असे. वर बोनसही मिळे. सरकारात तेव्हा फक्त पगारावरच समाधान मानायला लागे. त्यामुळे आतासारखी सरकारी नोकरी करण्याकडे कोणाचा फारसा कल नसायचा. सरकारी नोकरीतून देशसेवा वैगेरे करता येत असल्याचा साक्षात्कार साधारण ८४-८५ सालापासून सुरू झाला आणि आता तर सरकारी नोकरीतून देशसेवा करायला मिळावी म्हणून लोक काहीही करायला तयार आहेत. असो. घरात कमावते फक्त बाबा आणि आया घरी. तेव्हा आयांनी नोकरी करण्याची प्रथा आजच्यासारखी सर्रास झाली नव्हती. मुलं कमीतकमी चार असायचीच. रात्री जेवणं झाली, की मग दोन चाळीतल्या मधल्या गल्लीत बायका पोरांचा गप्पांचा फड रंगायचा. गप्पांचा ग्रुप वयोमानानुसार ठरायचा. पुरुषांचे पत्ते सुरू व्हायचे. दुसरी करमणूक काहीच नसायची.


रंगकामाची रंगत!

अशा या चाळीतल्या वातावरणात दसरा संपला की मग कुठूनतरी रंगांचा वास यायला सुरुवात व्हायची. चाळीतल्या कुणीतरी घरात रंगकाम करायला घेतलेलं असायचं. रंगाचा तो विशिष्ट वास माझ्यासाठी दिवाळी नजीक आल्याची वर्दी देणारा दूत बनूनच यायचा. आजही, माझ्या वयाच्या ५२व्या वर्षात, कुठेही रंगाचा वास आला, की मला चटकन दिवाळीच आठवते, इतकं रंग आणि दिवाळी यांचं नातं माझ्या मनात पक्कं ठसलं आहे. आता तीन रुमांच्या एकाच फ्लॅटमधील एका रुमच्या बंद दरवाज्याआड काय चाललंय, ते त्याच फ्ल्याटातल्या दुसऱ्या रूममधे कळत नाही, तर शेजारच्या फ्लॅटातलं काय डोंबलं (हा उच्चार मी ‘डोंबलं’ असाच करतो.) कळणार? प्रदूषण प्रमाणे प्रायव्हसी हा दुसरा अतिरेकी ही आधुनिक काळाची देण. कालाय तस्मै नम:. आताही टीव्हीवर नेरोलॅक किंवा एशियन पेंट्सच्या जाहिराती दिसायला लागल्या, की माझ्या मनात दिवाळी सुरू होते. रंग आणि दिवाळीचं नातं तेच लहानपणातलं असलं, तरी काळासोबत ते रंगांचा गंध ते रंगांचं चित्र एवढं बदललंय. हे ही कालाय तस्मै नम:..



फराळाची धांदल

दसऱ्याला सुटलेला रंगकामाचा वास विरतोय न विरतोय, तोच कोजागिरीपासून पुढे घराघरांतून जात्यांची घरघर ऐकायला यायची. आधी जात्यावर दळल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पिठांचा दरवळ आणि नंतर तळल्या जाणाऱ्या फराळाच्या पदार्थांचा घमघमाट चाळीत घुमायला लागायचा आणि ‘पहिली आंघोळ’ आता अगदी तोंडावर आल्याचं कळायचं. तेव्हा आजच्यासारखा आपण आपल्या घरापुरता फराळ करण्याची पद्धत नव्हती. ‘रेडिमेड’ असा शब्दही तेव्हा जन्मलेला नव्हता. चाळीतल्या सर्व स्त्रिया रात्री एकमेकींच्या घरी जाऊन लाडू, करंज्या, चकल्या, शेव, शंकरपाळ्या, चिवडा वैगेरे पदार्थ करीत. कोणाच्या घरी कोणता पदार्थ करायला कधी जायचं, याचा दिवस, नाही रात्र ठरलेली असायची. हा कार्यक्रम हमखास कोजागिरीनंतरच्या दोन-चार दिवसांनी सुरू व्हायचा ते पहिल्या आंघोळीच्या दोन दिवस अगोदर संपायचा. पहिल्या आंघोळीपूर्वीचे ते आठ-दहा दिवस तर चाळीतलं वातावरण भारलेलं आणि खमंग वासाने भरलेलं असायचं!



म्याचिंग-बिचिंगची भानगड!

इकडे आमची कंदील तयार करायची धांदल उडालेली असायची. चाळीतील सर्व १६ बिऱ्हाडांसाठी एकाच प्रकारचे कंदील करायचं काम आमच्याकडे असायचं. आम्ही तीन-चारजण मुलं कागद, गोंद खरेदी करून दिवाळीच्या दोन दिवस अगोदर कंदीलाचं काम आटोपून टाकायचो. कंदील प्रत्येक खोलीच्या बाहेर लागून प्रकाशमान झाले, की आम्हाला कृतकृत्य वाटायचं. मग टेलर आणि वेळ यांचा नवरा-बायकोचा संबंध तेव्हाही माहित असल्याने, टेलरकडे शिवायला दिलेले कपडे देण्याचा तगादा त्याच्या मागे लावायचा. रेडिमेड हा शब्द फराळासारखाच कपड्यांनाही तेव्हा लागू झाला नव्हता. तेव्हा वर्षातून एकदाच नवे कपडे मिळायचे, तेही दिवाळीतूनच. कापडखरेदी रंगकामासोबतच झालेली असायची. कापड मळखाऊ आणि टिकाऊ असणं एवढाच निकष असायचा. म्याचिंग-बिचिंगची भानगड नसायची. कपडेही ‘बँड’वाल्यांसारखे एकाच प्रकारचे. आता ‘ब्रॅन्ड’मधे किंमत सोडली तरी वेगळं काय असतं..! रंगाप्रमाणेच आजही नवीन कपड्यांचा तो कोरा गंध आणि त्यांची सरमिसळ झाल्याने टेलरच्या दुकानात येणारा एक विशिष्ट वास मला हमखास लहानपणीच्या दिवाळीची आठवण करून देतो. आज कपड्यांचा सुकाळ झाला असला, तरी दिवाळीच्या निमित्ताने कपडे खरेदी करायची हौस अद्याप टिकून आहे. या कपड्यांची मजा आणि त्यांचा तो गंध काही औरच..!

मग ती रात्र उजाडायची. पहिल्या आंघोळीच्या आदल्या दिवसाची रात्र. प्रत्येक मजेच्या दिवसाचा हा जो आदला दिवस असतो ना, तोच खूप मजेचा असतो. उद्या मजा ही कल्पनाच मोठी मजेची असते. रविवारपेक्षा शनिवरीच रविवारचं सुख रविवारपेक्षा जास्त अनुभवता येतं, तसंच..! प्रत्यक्ष सुखापेक्षा सुखाची कल्पनाच जास्त सुखदायी असते. तसंच दिवाळीच्या आदल्या रात्री वाटायचं. रात्री रांगेळीच्या ठिपक्यांचा कागद, रांगोळीची पुस्तकं, रंगांच्या डब्या शोधून ठेवलेल्या असायच्या. रात्री रांगोळीची जागा लाल गेरूने सारवून ठेवायची आणि उद्या पहाटे लवकर उठायचं म्हणून लवकर झोपून जायचं.



5 वाजता होणारी पहाट!

मग आतुरतेने वर्षभर वाट पाहात असलेली ती पहिल्या आंघोळीची पहाट अवतरायची. वाजण्याइतपत थंडी पडलेली असायची. तेव्हाची पहाट, पहाटे ५ वाजताच व्हायची. परिसरातून दिवाळीच्या स्वागतासाठी फटाक्यांच्या जोरदार सलामी सुरु झालेल्या असायच्या, त्या आवाजाने जाग यायचीच. आजुबाजूच्या खोल्यांतून चालू झालेली मालवणी गडबड, दोन सूत जाड पत्र्यांच्या भिंतीतून स्पष्ट ऐकायला यायची. उठलो की आई आंघोळीकरता मोरीत ढकलायची. थंडीतल्या पहाटेच उठून आंघोळीच्या पूर्वी ते थंडगार उटणं अंगाला लावताना अंगावर अगदी काटा यायचा पण पुढची मज्जा दिसत असल्याने तो जाणवायचा नाही. 

उटणं लावून झालं की मस्त कढत पाण्याचे दोन तांबे अंगावर ओतून घ्यायचे आणि अंगाला सुवासिक साबण लावायचा. सुवासिक हा शब्दही नंतरचा, आम्ही त्याला वासाचा साबण म्हणायचो. कारण एरवी वर्षभर ‘लाईफ बाॅय’ नावाचा एक वासहीन ठोकळा साबण म्हणून वापरलेला असायचा. कपड्यांप्रमाणे या गंधहीन साबणाचा निकषही मळखाऊ आणि टिकाऊ एवढाच असायचा. त्यामुळे लाईफ बाॅयच्या व्यतिरिक्त कोणताही साबण, आमच्यासाठी वासाचाच असायचा.




रांगोळीची हौस!

पहिली आंघोळ झाली, की मी रांगोळी काढायला बसायचो. मला रांगोळी काढायची अतोनात हौस होती तेव्हा. हे काम इतर घरातल्या बायका करायच्या, तर आमच्याकडे मी. माझी रांगोळी तेव्हाच्या माझ्या वयाच्या मानाने चांगलीही यायची. एका वर्षी मी काढलेली झाडावर बसलेल्या मोराची चित्ररांगोळी माझ्याच मनात इतकी पक्की बसलीय, की मला कुठेही मोराचं चित्र पाहिलं, की ती रांगोळीच आठवते. रांगोळी काढून होईपर्यंत दोस्त कंपनी जमा झालेली असायची आणि मग फटाके फोडणं या मुख्य कार्यक्रमाकडे वळायचं. जेवढा औरंगजेब गाण्यात मशहूर होता, तेवढाच मी खाण्यात असल्याने, फराळ हा खाण्यासाठी नसून फक्त वास घेण्यापुरताच असतो हा माझा समज आजही कायम आहे. त्यामुळे फराळाला फाटा देऊन, नवे कपडे घालून फटाके फोडणं हा मुख्य कार्यक्रम सुरु व्हायचा.


फटाक्यांचा दणदणाट

फटाक्यांत फुलबाजे, लवंगी, केपा आणि अगदीच कोणा दोस्ताच्या हौशी बाबांनी घेऊन दिलेले ‘ताजमहाल’ बाॅम्बची लडी. लक्ष्मीबाॅम्ब आमच्यापेक्षा मोठ्या मुलांचा प्रांत होता. ‘लक्ष्मी’ आणि ‘ताजमहाल’ ही वाजवायच्या फटाक्यांची नावं आहेत एवढंच माहीत होतं तेव्हा. हे ‘स्फोटक’ ऐवज आहेत हे आत्ता आत्ता कळतंय. असो. केपा किंवा टिकल्या फोडण्यासाठी हातोडी असायची. पिस्तुलांची हौस परवडण्यासारखी नव्हती. जमीनचक्र, पाऊस वैगेरे ठराविकच, म्हणजे अर्धा डझनच, मिळायचे म्हणून ते जपून वापरायचे. इतके जपून की त्यातले काही पुढे दिवाळी संपल्यानंतरही शिल्लक राहायचे. अर्थात, प्रत्यक्ष फोडण्यापेक्षा ते शिल्लक राहिले याचा आनंदही काही कमी नसायचा. शिल्लक राहाण्यासारखंच वापरायचं याची शिकवण तेव्हा अशी नकळत मिळायची. ही सवय मग पुढे सर्वच बाबतीत लागली. लवंगी, ताजमहाल फोडतानाही पूर्ण माळ लावायची नाही, तर त्या माळेतला एक एक लहान फटाका सुटा करून अगरबत्तीने शिलगावून एक एक करून फोडायचा. आख्खी माळ फोडण्यापेक्षा ती सुटी करून एक एक करून आणि सर्व मित्रांनी मिळून फटाके फोडण्यात मजा असते हे तेव्हाच कळलं होतं. पहाटे पाच ते साधारणत: सात-साडेसातपर्यंतचे दोन-अडीच तास, परिसर वाजणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेलेला असायचा. पुढे पहाटे लवकर उठणं झालेलं असल्याने सकाळी १०-११ च्या दरम्यान पेंग येऊ लागायची. उत्साह तर असायचा, पण डोळे आपोआप मिटले जायचे आणि ‘पहिल्या आंघोळी’च्या सुखात झोपून जायचं.


बदलता काळ, बदलती दिवाळी!

आता सर्वच बदललं. सुखाच्या, आनंदाच्या कल्पनाही बदलल्या. काळाबरोबर हे सारं बदलणारच, पण त्या लहानपणात अनुभवलेल्या दिवाळीचं सुख आताची दिवळी अनुभवताना, नकळतच ‘आमच्या वेळची’ दिवाळी काही औरच आणि जास्त राजस होती असं वाटतं. आम्ही लहान असताना आमच्या आई-वडिलांनाही तसंच वाटत असणार यात शंका नाही. पुढे जाणारी प्रत्येक पिढी आपल्या मागच्या दिवसांत रमलेली असतेच. असं रमलेलं असताना आपण जगतोय, मात्र आताच्या काळात, हे विसरून चालणार नाही. जुन्या आठवणी कायम ठेवून नवीन काळात स्वत:ला रुजवणं आवश्यक आहे.

असं असूनही काही गोष्टी स्विकारायला अजून मन होत नाही. उदा. फटाक्यांचा आवाज. फटाक्यांचा दणदणाट नाही, तो धुराचा संमिश्र वास नाही, तर दिवाळी कसली? असा तेेव्हा माझा समज होता आणि आजही आहे. मला तर आजची पहिली आंघोळ, पहिली आंघोळ वाटलीच नाही. यंदा फटाका फोडल्याचा दणदणीत मरो, पुसटसाही आवाज ऐकलेला नाही. दिवाळीसारखी सणांची राणी येणार आणि तिला आपण फटाक्यांच्या तोफांची सलामी देणार नाही, तर मग वर स्वर्गात बसून, दिवाळीला खाली पृथ्वीवर पाठवणाऱ्या देवांना, ती पृथ्वीवर पोचल्याचं कळणार कसं? आता तर फटाक्यांवर कोर्टाने बंदी घातलीय. कोर्ट पूर्वीही होतं, पण पूर्वीच्या कोर्टालाही तेव्हा न्यायदानाचंच काम असल्याने, ते लोकांच्या आनंदात आतासारखं नाक किंवा तत्सम अवयव खुपसतही नसे. काळा आणि पांढरा असे दोनच रंग माहीत असणाऱ्या कोर्ट आणि सरकारादी कौतुकांना, दिवाळीची बहुविध रंगांची, गंधांची आणि आवाजाची दुनिया काय कळणार..!

लहानपणीचा मी अनुभवलेला दिवाळीचा जादुई काळ माझ्या वयाच्या प्रत्येकाने अनुभवला असावा. आताच्या ‘प्रदूषण’, ‘प्रायव्हसी' इतक्याच ‘परीक्षा’ या भयंकर शब्दानं तेव्हा आमचं बालपण हिरावून घेतलं नव्हतं. अभ्यास हा शाळेतच करायचा असतो हा अनुभवसिद्ध समज होता. तेव्हाच्या शाळेत ज्ञानाच्या व्याख्येत बसेल असं काहीतरी गवसायचं आणि त्याचं प्रात्यक्षिक समाजात पाहायला, अनुभवायलाही मिळायचं. चार आकडी पगार ही श्रीमंतीची कल्पना असलेल्या त्या दिवसांत, गरीबी हा काॅमन फॅक्टर असल्याने, सर्वांच्या आनंदाची व्याख्याही कमी-अधीक फरकाने सारखीच असायची. सर्व माणसं समान पातळीवर असायची. थोडक्या गोष्टीत काय गंमत असते, हे सर्वच उतू जाणाऱ्या परिस्थितीत जन्मलेल्या आताच्या पिढीला नाही कळायचं.

असो. कालाय तस्मै नम: म्हणत आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि जे जसं समोर आलंय, ते तसंच आनंदाने उपभोगायचं. ही शिकवणही बालपणीचीच..!

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!


नितीन साळुंखे यांच्या फेसबुक पोस्टवरुन साभार...


Disclaimer: The views and opinions expressed in this article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of Mumbai Live.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा