भारतासह महाराष्ट्रात गणेशोत्सवाची पंरपरा अगदी पेशवे काळापासून सुरू आहे. खरेतर धार्मिक परंपरेला सामाजिक रुप देण्याचे काम करत लोकमान्य टिळकांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली.
या उत्सवाला प्रांरभ झालेल्या वर्षीच म्हणजेच 1893 मध्ये गिरगावातल्या कांदेवाडीतील केशवजी नाईक चाळीत पहिल्यांदा गणेशाची सार्वजनिक पद्धतीने स्थापना करण्यात आली. त्यानंतर अनेक मंडळांनी ही परंपरा सुरू केली. या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला यावर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत.
आज मुंबईसह उपनगरातल्या प्रत्येक विभागात अंदाजे 11,500 गणेश मंडळं आहेत. यंदा सर्व गणपती मंडळांची तयारी धडाक्यात सुरू आहे. मुंबईत काही मंडळांच्या राजाचे आगमन रविवारी 20 ऑगस्ट रोजी झाले.
परळच्या नरेपार्क येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच परळचा राजा. या मंडळाचे यंदाचे हे 70 वे वर्ष आहे. 1947 साली गणेशोत्सव मंडळाने गणेश उत्सवाची सुरुवात केली.
‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ या सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना 1920 मध्ये झाली. हे मंडळ शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. अगदी परदेशातही या मंडळाची कीर्ती पसरली आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत रविवारी ग्रँटरोडच्या राजाचे आगमन झाले. या मंडळाची स्थापना 1964 मध्ये झाली होती.
या मंडळाची स्थापना 1956 साली झाली. सुरुवातीच्या काळात हे मंडळ 3 ते 4 फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत होते. त्यानंतर 1975-85 च्या काळात काळाचौकीतील दिग्विजय मिल चाळीच्या पटांगणात दिव्य मंडप उभारण्यात येत होता. आता त्या छोटेखानी मंडळाचा आकार विस्तारला आणि तेच बाप्पा आज काळाचौकीचा महाराजा या नावाने प्रसिद्ध आहेत.
खेतवाडी चौथी क्रॉस लेन या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1958 मध्ये झाली. दरवर्षी या मंडळाकडून बाप्पांच्या भव्यदिव्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
विलेपार्लेचा विघ्नहर्ता म्हणजेच बालमित्र श्री गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1977 मध्ये झाली. 'आगमनाचा राजा विघ्नहर्ता माझा' असे म्हणत या मंडळाचा गणपती आगमन सोहळा रविवारी वाजत गाजत पार पडला.
गणेश गल्लीतील गणपती हा ‘मुंबईचा राजा’ म्हणून प्रसिद्ध आहे. लालबागचा राजा या मंडळाजवळच दरवर्षी या बाप्पाची स्थापना केली जाते. 1927 साली या मंडळाची स्थापना झाली. यावर्षी हे मंडळ 90 व्या वर्षी पदार्पण करत आहे. हे मंडळ दरवर्षी आकर्षक देखावे सादर करते. याशिवाय प्रत्येक वर्षी 20 ते 22 फूट उंच मूर्तीची स्थापना करणे हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत या मंडळाच्या भल्या मोठ्या बाप्पांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात.
खेतवाडीतील बारावी लेनच्या ‘खेतवाडीचा गणराज’ या मंडळाची स्थापना 1959 मध्ये झाली. 2000साली गणेशोत्सवादरम्यान 40 फूट उंच मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर या मंडळाला विशेष प्रसिद्धी मिळाली.
मुंबईतल्या वडाळ्यातील जीएसबी सेवा गणेश मंडळाचा बाप्पा सोन्याचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंडळ सर्वात महागड्या मंडळांपैकी एक आहे. याची स्थापना 1954 मध्ये कर्नाटकातील एका समितीने केली होती. हा गणपती संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे.
अंधेरीचा राजा मंडळाची स्थापना तंबाखू कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी 1966 मध्ये केली होती. यावर्षी या मंडळाने आपल्या बाप्पासाठी 5 लाखांचा विमा काढला आहे. मागच्या वर्षी या मंडळाने बाप्पासाठी दीड लाखांचा विमा काढला होता. सामान्यांपासून ते नेते आणि अभिनेतेही या बाप्पाच्या दर्शनासाठी येतात.
ज्यावेळी सर्वात आधी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, तेव्हा गिरगावमध्ये केशवजी नाईक चाळ या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाचे यंदाचे हे 125वे वर्ष आहे. हे मंडळ दरवर्षी 2.5 फुटाच्या मूर्तीची स्थापना करते. 1901 मध्ये स्वत: लोकमान्य टिळकांनी या मंडळाला भेट दिली होती.
मरीन लाईन्स पूर्व येथील चंदनवाडीचा राजा या मंडळाची स्थापना 1977 मध्ये झाली होती. हे मंडळ सुरुवातीला चाळीत छोट्याशा बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करत होते. पण हळूहळू या सोहळ्याला विशाल रुप प्राप्त झाले. देखाव्यातून सामाजिक संदेश देणे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.
बोरिवली पश्चिमेकडील गणेश मंदिर रोड येथील कस्तूरपार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1979 मध्ये झाली. बोरिवली पोलिसांनी 2011 मध्ये या मंडळाला शिस्तबद्धतेसाठी पुरस्कार दिला होता. हे मंडळ आपल्या देखाव्यातून दरवर्षी सामाजिक संदेश देते. गरजू रुग्णांना मदत आणि विद्यार्थांना शैक्षणिक निधी देणे असे अनेक सामाजिक उपक्रम दरवर्षी हे मंडळ राबवत असते.
या मंडळाची स्थापना 1962 साली झाली. नवसाला पावणारा महागणपती अशी या मंडळाच्या बप्पाची ओळख आहे. हे मंडळ दरवर्षी देखाव्यातून समाजप्रबोधन आणि पर्यावरणाविषयी जनजागृतीचे संदेश देते.
घाटकोपर पश्चिम येथील पारशीवाडीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 'सुवर्ण राजा' या नावानेही प्रसिद्ध आहे. या मंडळाची स्थापना 1953 मध्ये झाली होती. हे मंडळ देखील सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे.
हेही वाचा -
गणपतीसाठी तयार होत आहेत खास 'इको फ्रेंडली' मखर!
यंदाच्या गणेशोत्सवात दरवळणार 'या' अगरबत्त्यांचा सुगंध!