सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मुंबईच्या दहीहंडी उत्सवावर परिणाम होणं अपेक्षितच होतं. आणि तसाच तो झालाही. मनसे आणि राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आणि मनसे पुरस्कृत मंडळांनी 20 फुटांची मर्यादा मोडून काढत कुठे 6 कुठे 7 तर कुठे 9 थर लावत थेट सर्वोच्च न्यायालयाच्याच निर्णयाला आव्हान दिलं. अशा मंडळांवर आणि गोविंदांवर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय. आता या मंडळांवर आणि गोविंदांवर कारवाई होईल तेव्हा खरं. मात्र एकीकडे अशा प्रकारे न्यायालयाच्या आदेशांची सर्रास पायमल्ली होत असतानाच दुसरीकडे काहींनी न्यायालयाच्या या आदेशांचा जाहीर निषेध करण्याचा मार्ग पत्करला. न्यायालयाचा अवमान न करता हा सविनय 'हंडी'भंग करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवण्यात आल्या. दादरच्या जय हनुमान गोविंदा पथकानं थेट शीडी लावून हंडी फोडली. तर मालाडच्या बाळा हनुमान गोविंदा पथकानं तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. दादरच्याच कोकण नगर गोविंदा पथकानं तर चक्क जमिनीवर झोपून ९ थर लावले. त्यामुळे या गोविंदांना थेट नियम मोडता येत नसला, तरी त्यांनी सविनय 'हंडी'भंग मात्र साधलाय हे नक्की.