दिवाळीचा सण म्हटला की गोडा-धोडाच्या पदार्थांची भेटवस्तू देणं आलंच. अनेकदा भेटवस्तूंच्या स्वरूपात किंवा दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवशी गोड पदार्थ म्हणून बाजारातून विकतची मिठाई आणली जाते. आजकाल मिठाईंना आकर्षक रूप देण्यासाठी सोने, चांदीचा वर्ख लावला जातो. परंतु सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाईंमध्ये भेसळचं प्रमाणही वाढलं आहे.
भेसळयुक्त मिठाईमुळे विषबाधा, मळमळणं, उलट्या होणं, जुलाब होणं अशा समस्या प्रामुख्याने आढळतात. मिठाई खाणं जीवावर बेतू शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे. प्रामुख्यानं केवळ आकर्षक भाग म्हणून मिठाईंवर लावलेला चांदीचा वर्ख भेसळयुक्त तर नाही ना? हे ओळखण्यासाठी काही साध्या सोप्या ट्रिक्स मदत करू शकतात.
१) मिठाईवरून केवळ बोट फिरवलं तरीही चांदीचा वर्ख भेसळयुक्त आहे की नाही याची माहिती मिळू शकते. जर तुमच्या बोटाला चांदीचा वर्ख लागला तर समजा तो अॅल्युमिनियमयुक्त आहे.
२) चांदीचा वर्ख तुम्ही घरी आणून मिठाईंवर लावणार असाल तर थोडी काळजी घ्या. तो भेसळयुक्त असल्याची तुम्हाला शंका आल्यास तो दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये धरा आणि चोळा. चांदीचा वर्ख असल्यास तो तुमच्या हाताला लागेल. मात्र जर त्यामध्ये अॅल्युमिनियम असेल तर त्याचा गोळा होईल.
३) चांदीच्या वर्खावर हायड्रॉलिक अॅसिडचे काही थेंब टाका. चांदीचा वर्ख असेल तर तो गढूळ होतो. मात्र तो अॅल्युमिनियमयुक्त असेल तर तो गढूळही होत नाही आणि त्याचे अवशेषही खाली राहत नाहीत.
४) चांदीच्या वर्खाचा छोटासा तुकडा जाळला तरीही तुम्हाला तो भेसळयुक्त आहे की नाही ? याची माहिती मिळू शकते. जाळल्यानंतर जर तो भेसळयुक्त असेल तर काळसर होतो. मात्र चांदीचा वर्ख असेल तर तो गरम केल्यानंतर एकत्र जोडून बॉल तयार होतो. भेसळयुक्त चांदीच्या वर्खात अॅल्युमिनियमची भेसळ असल्यास ती काळी पडू शकते.