थंडी सुरू झाली, की भूक जास्त लागते. सारखं काहीतरी खावसं वाटतं. खरंतर थंडीत होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे आपल्या शरीराला एनर्जी सेल्स म्हणजेच उर्जेची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्यामुळे शरीराला सतत खाण्याची इच्छा होते. त्यामागेही काही वैज्ञानिक कारणं आहेत.
मेंदूतील ‘हायपोथेलॅमस’ हा भाग आपल्या भुकेच्या इच्छेवर नियंत्रण ठेवतो. त्यातले ‘लॅटरल हायपोथेलॅमस’ हे केंद्र खाण्याची इच्छा जागवते आणि ‘व्हेन्ट्रो मीडियल हायपोथेलॅमस’ हे केंद्र भूक भागल्याचा संदेश देते.
थंडीत शरीराचा ‘बेसल मेटाबॉलिक रेट’ वाढला की भूक जास्त लागते. भूक लागल्यावर जे खाल्लं जातं ते लवकर पचतं. अन्न पचल्यावर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे रक्तातले ‘ग्लुकोस्टॅटिक रिसेप्टर्स’ लॅटरल हायपोथेलॅमसला साखरेचं प्रमाण कमी झाल्याचा संदेश देतात. मग लॅटरल हायपोथेलॅमस खाण्याची इच्छा निर्माण करतो. भूक भागल्यावर पुन्हा पुन्हा हीच प्रक्रिया शरीरात घडत राहते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते. त्यामुळे थंडीत तुम्ही रात्री जरी जेवलात, तरी ते अन्न अगदी सहज पचतं. शरीराता उष्णता निर्माण व्हावी म्हणून आपण खातो. ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. कॅलरीज बर्न केल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
पण, थंडीत नेमकं काय खावं आणि काय खाऊ नये? याबाबत, आपण थोडा विचार करायला हवा. खरंतर, प्रत्येक व्यक्तीचा डाएट प्लॅन हा वेगळा असतो. त्यामुळे स्पेसिफिक असा डाएट प्लॅन थंडीत नाही केला, तरी चालतो. कारण, थंडीत खाल्लं जाणारं अन्न सहज पचतं. त्याचे काही साईड इफेक्ट्सही होत नाहीत. याच विषयी 'मुंबई लाइव्ह'ने 'वाचन आरोग्य' आणि 'डाएबिटीज केअर ३६५'च्या सल्लागार आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अंकिता घाग यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी थंडीत कशा प्रकारचा आहार घ्यावा? यावर सल्ला दिला आहे.