Advertisement

मुंबई-ठाण्याहून सरकणारा कोरोना संसर्ग चिंताजनक- उद्धव ठाकरे

मुंबई, ठाण्याकडून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणारा कोरोनाचा संसर्ग निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे, असं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

मुंबई-ठाण्याहून सरकणारा कोरोना संसर्ग चिंताजनक- उद्धव ठाकरे
SHARES

मुंबई, ठाण्याकडून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणारा कोरोनाचा संसर्ग निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या प्रकारे सर्वसामान्य जनतेने सहभाग घेता होता. तसंच योगदान कोरोनामुक्तीच्या लढ्यात देण्याची गरज आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं. (coronavirus spread outside of mumbai and thane is cause for concern says maharashtra cm uddhav thackeray)

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुढच्याला ठेच मागचा शहाणा, या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होऊ देऊ नका. इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करत आहेत. आपल्याकडे गणेशोत्सव, मोहरम पार पडला. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पाऊस सुरु आहे. त्यामुळे आपलं आव्हान अधिक मोठं आहे. हा कसोटीचा काळ आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रीत करा तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रूग्णामागचे जास्तीत-जास्त संपर्क शोधा. चेस द व्‍हायरस मोहीम अधिक गांभीर्याने राबवा. कंटेन्मेंट क्षेत्रात कडक नियम पाळा. चाचण्यांची क्षमता वाढवा. घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या.

हेही वाचा - “उद्धव ठाकरे सर्वाधिक काळ घरात राहणारे पहिलेच मुख्यमंत्री”

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहाय्यक यांच्या सहभागाने घरोघरी भेटी देऊन कुटुंबाच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, यात घरातील कुणाला इतरही काही आजार आहेत का. त्यांचं आरोग्य कसं आहे. त्यांना न्युमोनिया सदृश काही लक्षणं आहेत का, घरात बाहेरून कुणी व्यक्ती आले आहेत, मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचं पालन व्यवस्थित केले जाते का, याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल. केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे, तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका.

कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल, पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावा. शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री अतिशय महत्त्वाची आहे, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सुविधा उभारण्यात मदत केली जाईल. निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही. इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा. अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा - मोदी फक्त ४ तास झोपतात, तेवढा वेळ तरी काम करा, भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा