कधी कडक उन तर कधी पाऊस अशा विचित्र ऋतूचक्रात अडकलेल्या मुंबईकरांना आता साथीच्या आजारांनीही हैराण केलं आहे. यंदा लांबलेल्या पावसामुळे डेंग्यूचा प्रादूर्भाव चांगलाच वाढला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णाची संख्या ७०० नी वाढली आहे.
यंदा सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २,७५५ वर पोहोचली असून गेल्या वर्षी याच महिन्यांत २,०४७ रुग्णांना डेंग्यू झाला होता. एवढंच नाही, तर २१ ऑक्टोबपर्यंत २,१८३ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली. डेंग्यूने आतापर्यंत ७ रुग्ण दगावले असून गेल्या वर्षभरात डेंग्यूने ७० जणांचा मृत्यू झाला होता.
गेल्या वर्षी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून मुंबईत साथीचे आजार धक्कादायकरीत्या बळावल्याचं दिसून आलं होतं. त्यामागचं कारण होतं साथीचे रोग पसरवणाऱ्या डासांची पैदास. मुंबईत तब्बल २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूच्या प्रसाराला कारणीभूत ठरणाऱ्या 'एडीस एजिप्ताय' डासांच्या अळ्यांची उत्पत्ती वाढल्याचं पुढे आलं होतं. यातील निम्म्या अर्थात १४ हजार ९३० ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या ड्रममध्ये आढळल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या किटक नियंत्रण खात्याद्वारे देण्यात आली होती.
हेही वाचा-
भटक्या गुरांसाठी आयआयटी मुंबईत गोसंवर्धन?
'खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’, महापालिकेचं मुंबईकरांना चॅलेंज