सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी साथीच्या आजारांचं प्रमाण घटलेलं नाही. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं पावसाळी आजारांविषयी दिलेल्या अहवालानुसार, यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच गेल्या ३ महिन्यांत मलेरियाचा पहिला बळी गेला आहे. वरळी कोळीवाड्यातील ५२ वर्षीय व्यक्तीचा मलेरियामुळं मृत्यू झाला असून आतापर्यंत लेप्टोने एकूण ९ बळी गेले आहेत.
सध्या बदलत्या वातावरणामुळं ताप, लेप्टो, डेंग्यू, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पाऊस सुरू झाला की, साथीच्या रूग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होते. जुलै, आॅगस्ट महिन्यात आरोग्य विभागानं दिलेल्या पावसाळी आजाराविषयीच्या अहवालात हे स्पष्ट दिसून येतं. ऑगस्ट महिन्यात महापालिकेच्या ई वॉर्डमध्ये २, तर एफएन वॉर्डमध्ये १ असे ३ कॉलराचे रुग्णही आढळून आले आहेत. तसंच जुलै व ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळून न आल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
आजार | जुलै २०१८ | आॅगस्ट २०१८ (१५ आॅगस्टपर्यंत) |
---|---|---|
मलेरिया | ६२४ | ४१५ |
डेंग्यू | ६० | ७९ |
लेप्टो | ९७ | २८ |
गॅस्ट्रो | १०८९ | ३७६ |
हेपेटायटिस | १०४ | ८१ |
स्वाईन फ्लू | ० | ० |
आतापर्यंत वरळीत एका सफाई कामगाराचा मलेरियामुळं, कुर्ल्यात डेंग्यूमुळं एका व्यक्तीचा, लेप्टोमुळं दोघांचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार थैमान घालतात, त्या पार्श्वभूमीवर यंदा महापालिका प्रशासनाकडून काही उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या उपाययोजना महापालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये सुरू असून त्यातील संशंयित रुग्णांना तातडीनं उपचार देण्यात येत आहेत. या सर्व उपाययोजनामुळं यंदाच्या साथीच्या आजार कमी झाले आहेत.
- डॉ. पद्मजा केसकर, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य विभाग
हेही वाचा-
व्हिटॅमिनच्या जागी दिलं कॅन्सरचं औषध, विक्रेत्याचा परवाना रद्द
सायन रूग्णालयातील शवविच्छेदन विभाग २४ तास सुरू