मुंबईसह राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारासाठी येत असतात. महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या या रुग्णांमध्ये गोरगरीबांची संख्या अधिक असते. त्यामुळं त्यांना जास्त किमतीची औषधं घेणं शक्य नसतं. त्यामुळं अशा रुग्णांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयाच्या धर्तीवर वाजवी दरात औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे.
गोरगरीब रुगणांना सवलतीच्या दरात औषध उपलब्ध व्हावी यासाठी 'अमृत फार्मसी' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या 'अमृत औषध भांडारा'मध्ये गरीब रुणांना केवळ ४० टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, पालिकेच्या रुग्णालयांतील कारभारात समन्वय आणि सुसूत्रता आणण्यासाठी पालिकेने केईएम, कूपर, नायर आणि शीव रुग्णालयात सीईओ नेमून त्यांचा कारभार पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत जोरदार विरोध केला.
या पार्श्वभूमीवर सीईओंच्या जागी पालिकेनं रुग्णालयाच्या माजी उप अधिष्ठात्यांची नेमणूक करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. याला पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या ४ दिवसांत कार्यवाही करण्यात येणार असल्याचं आश्वासनही दिलं आहे.
हेही वाचा -
लोकलमधील हल्ल्यातील जखमी महिला प्रवाशांना मिळणार आर्थिक मदत?
आर्थिक मदत मिळत नसल्यानं मच्छिमार राज्यपालांवर नाराज