अत्याचारपीडित महिला व बालकांसाठी मुंबई महानगरपालिका आणि केंद्रीय महिला आणि बालविकास यांच्या संयुक्त विद्यमाने केईएम रूग्णालयात सुरू करण्यात आलेलं 'वन स्टाॅप सेंटर' हे मुंबईतील अशा प्रकारचे पहिलं केंद्र आहे. या उपचार केंद्राची रचना कशी असावी, तिथलं इंटिरिअर डिझाइन ‘रूग्णस्नेही’ कसं असावं, याबाबत अत्यंत संवेदनशीलतेने सर्व अंगांनी विचार करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला बालविकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते बुधवारी या 'वन स्टाॅप सेंटर'चं उदघाटन करण्यात आलं. अत्याचार पीडित महिलांना व बालकांना एकाच ठिकाणी वैद्यकीय उपचार, कायदेशीर मदत, समुपदेशन आणि तात्पुरता निवारा देणारं हे पहिलं-वहिलं सेंटर डिझाइन करून प्रत्यक्षात साकारण्याची महत्वाची जबाबदारी आर्किटेक्ट आणि इंटिरिअर डिझायनर देवांगी लाड-देशमुख यांनी समर्थपणे पेलली.
याविषयी अधिक माहिती देताना आर्किटेक्ट देवांगी लाड म्हणाल्या, "केईएमच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सेंटरमागची संकल्पना विशद केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास संमती दिली आणि त्यानंतर या केंद्राची डिझाइन प्रक्रिया प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला."
पीडितांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेचा विचार करून हे सेंटर डिझाइन करण्यात आलं आहे. रूग्णाला सुरक्षित वाटेल, अशी रचना करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलं गेलं. रुग्णाने सांगितलेली अत्याचाराची माहिती गोपनीय राहील याबाबतचा विश्वास निर्माण व्हावा, यासाठी समुपदेशनाच्या खोलीची रचना ध्वनिविज्ञानानुसार (अकोस्टिक्स) करण्यात आली आहे. रुग्णासाठी वैद्यकीय उपचारांच्या आवश्यकतेनुसार, तर डाॅक्टरांसाठी त्यांच्या गरजांनुसार खोल्यांची रचना करण्यात आली.
- देवांगी लाड, आर्किटेक्ट
"उपचार केंद्रात नेहमीच्या रूग्णालयासारखे वातावरण न राहता तिथे आरामदायी वातावरणनिर्मिती होऊन रुग्णाला प्रसन्न वाटून तो लवकर बरा व्हावा यासाठी एक कृत्रिम उद्यानही बनवण्यात आलं आहे. संपूर्ण उपचार केंद्रातली रंगसंगती कुठेही गडद नसून शांत आणि संतुलित वातावरणास साजेशी अशी रंगसंगती ठेवण्यात आली", असंही देवांगी लाड यांनी सांगितलं.
हेही वाचा-
मुंबईच्या रस्त्यांवर लागणार ‘वाॅटर एटीएम’
राणीबागेत होणार पट्टेरी वाघाचं दर्शन