Advertisement

मुंबईतील कोळीवाड्याच्या सीमांकनांसाठी विधानसभाध्यक्षांचे निर्देश

कोळीवाड्याच्या सीमांकनाचं काम अर्धवट राहिलं असल्यास स्थानिक कोळी बांधवांना विश्वासात घेऊन ते काम तातडीने पूर्ण करावं, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

मुंबईतील कोळीवाड्याच्या सीमांकनांसाठी विधानसभाध्यक्षांचे निर्देश
SHARES

कोळीवाड्याच्या सीमांकनाचं  काम अर्धवट राहिलं असल्यास स्थानिक कोळी बांधवांना विश्वासात घेऊन ते काम तातडीने पूर्ण करावं, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

मुंबईतील (mumbai) उर्वरित २९ कोळीवाड्यांचे सीमांकनाच्या कामाबाबत विधानभवन इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील उर्वरित २९ कोळीवाड्यांचे सीमांकनाच्या कामाला चालना देण्यासाठी महसूल, नगरविकास, मत्स्य व्यवसाय विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

मुंबईमध्ये एकूण ४१ कोळीवाडे असून मुंबई शहरमध्ये १२ मुंबई उपनगरात २९ कोळीवाडे आहेत. यापैकी काही कोळीवाड्याचं सीमांकन झालेले नाही. या कोळीवाड्याचं सीमांकन कोळी बांधवांना विश्वासात घेऊन तातडीने पूर्ण करावं, असे निर्देश नाना पटोले यांनी दिले आहेत.

यावेळी सायन कोळीवाड्याच्या जागेवर अतिक्रमण झालं आहे. इतर कोळीवाड्याच्या सीमांकनाबाबत संरक्षण देण्यात यावे किंवा नवीन बांधकामसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी कोळी बांधवाच्या वतीने करण्यात आली.

हेही वाचा- सीमा लढा माझ्या अंतरकरणाच्या जवळचा विषय- उद्धव ठाकरे

याआधी कोळीवाडा सीमांकनासंदर्भात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत कोळीवाड्यातील समस्या व त्यावरील उपाययोजना यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. कोस्टल झोन प्राधिकरण, मुंबई महापालिका, पर्यावरण विभाग आदी संबंधीत सर्व विभागांनी यासंदर्भात समन्वयाने काम करावं, असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर येथील यासंदर्भातील आढावा यावेळी घेण्यात आला. 

अंतिम सीमांकन होईपर्यंत ग्रे क्षेत्रातील लोकांना हलवू नये, अशी विनंती तेथील नागरिकांनी केली आहे. याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात तशा सूचना मुंबई महापालिकेला देण्यात येतील, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबई उपनगरातील ४२ क्षेत्रांचं सर्वेक्षण झालं असून त्यापैकी २१ क्षेत्रांचं सीमांकन निश्चित करण्यात आलं आहे. १४ क्षेत्रांचं सीमांकन प्रगतीपथावर आहे. मुंबई शहरातील १९ क्षेत्रापैकी १२ क्षेत्रांचं सीमांकन झालं असून ७ क्षेत्र ही एमबीपीटी, रेल्वे, केंद्र शासन यांच्या मालकीची जमीन असल्याने काही समस्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

‘सीएमएफआरआय’च्या अहवालानुसार मच्छिमारीशी संबंधीत विविध कामांच्या क्षेत्राचा सीमांकनामध्ये समावेश करणं शिल्लक आहे. महसूल विभागाकडून करण्यात आलेलं सीमांकन प्रसिद्ध करण्यात आलं असून यासंदर्भात प्राप्त झालेल्या सूचना व हरकती महसूल विभागास कळविण्यात येतील, असं मुंबई महापालिकेच्या संबंधीत विभागाकडून यावेळी सांगण्यात आलं. कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनच्या अनुषंगाने मच्छिमार गावांच्या सीमांकनाबाबत यावेळी चर्चा झाली. गावठाणातील समस्यांसंदर्भातही चर्चा झाली.

(maharashtra vidhan sabha president nana patole directs to complete border mapping work of koliwada in mumbai)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा